सोलापूर/ दहिवडी : राष्ट्रवादीने केलेल्या ७० हजार कोटींच्या घोटाळ्याची कुंडली माझ्याकडं आहे. त्यामुळे तुम्हीच ठरवायचंय की या लबाडांना मतदान करायचंय की नाही असे आवाहन माढ्यातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदारांना केले.मलवडी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, बाळासाहेब मासाळ, विजयकुमार साखरे, डॉ. उज्ज्वलकुमार काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. दिलीप येळगावकर म्हणाले , ज्यांनी आपली जिरवली त्यांची जिरवायची वेळ आली आहे. अनिल देसाई म्हणाले, आता जिहे-कटापूरचं पाणी आंधळी तलावात येणे गरजेचे झाले आहे. सतीश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप भोसले यांनी आभार मानले.
बारामतीकरांनी एकही शब्द पूर्ण केला नाही...- बारामतीकरांनी एकही शब्द पूर्ण केला नाही. पाण्यापेक्षा पैसा खाण्याकडे यांचं अधिक लक्ष राहिलं आहे असा आरोप रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला. आपल्या भाषणात रणजितसिंह निंबाळकर यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. आपली लढाई संजय शिंदे यांच्याशी नसून थेट बारामतीकरांशी आहे, असेही ते म्हणाले.