विजयदुर्ग-मुंबई प्रवास आता केवळ साडेचार तासांत!, सिंधुदुर्ग जिल्हा जलवाहतुकीने मुंबईशी जोडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:25 IST2026-02-12T13:24:05+5:302026-02-12T13:25:06+5:30
जिल्हा नियोजनाचा ६०० कोटींचा आराखडा मंजूर; ४५०० कोटींच्या गुंतवणुकीतून रोजगाराची संधी

विजयदुर्ग-मुंबई प्रवास आता केवळ साडेचार तासांत!, सिंधुदुर्ग जिल्हा जलवाहतुकीने मुंबईशी जोडणार
सिंधुदुर्गनगरी : "सिंधुदुर्ग जिल्ह्याला जलवाहतुकीद्वारे मुंबईशी जोडण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम लवकरच सुरू होत आहे. ‘एम टू एम’ (M to M) प्रकल्पांतर्गत विजयदुर्ग ते मुंबई हा प्रवास केवळ साडेचार तासांत पूर्ण होईल," अशी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आमदार दीपक केसरकर, नीलेश राणे, ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यासाठी ६०० कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला. दावोस करारांतर्गत जिल्ह्यात ४५०० कोटींची गुंतवणूक होणार असून, यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असेही पालकमंत्र्यांनी नमूद केले.
पर्यटनाला नवे धुमारे: ट्री-हाऊस अन् हेलिटूरिझम!
आमदार दीपक केसरकर यांनी मांडलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात वन पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. पारपोलीच्या धर्तीवर इतर ठिकाणीही 'ट्री हाऊस' उभारणे, पावसाळी धबधब्यांच्या पर्यटनाचे नियोजन आणि 'हेलिटूरिझम' प्रकल्प राबवण्यावर बैठकीत भर देण्यात आला तसेच चिपी विमानतळाचा 'उडाण' योजनेत समावेश करण्याची मागणीही लावून धरण्यात आली.
शाळांच्या सुरक्षिततेसाठी 'सीसीटीव्ही'चा वॉच!
आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शाळांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही बसवण्याचे आणि शालेय बसचालकांची चारित्र्य पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, परीक्षेच्या काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना ‘महावितरण’ला दिल्या आहेत.
स्वच्छतेसाठी 'इंदूर' पॅटर्नचा अभ्यास
जिल्ह्यात स्वच्छता मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी इंदूर येथील उपक्रमांचा अभ्यास केला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील अधिकारी व पत्रकारांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.