Sindhudurg ZP Election: सिंधुदुर्गात महायुतीचे जागा वाटप जाहीर; भाजपा, शिंदेसेना किती जागा लढणार..वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 20:58 IST2026-01-19T20:56:25+5:302026-01-19T20:58:45+5:30
नारायण राणेंकडून घोषणा, जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा फॉर्म्युला ठरला

Sindhudurg ZP Election: सिंधुदुर्गात महायुतीचे जागा वाटप जाहीर; भाजपा, शिंदेसेना किती जागा लढणार..वाचा
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती निश्चित झाल्यानंतर जागा वाटप निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या ५० जागांपैकी भाजप ३१, तर शिंदेसेना १९ जागा लढविणार आहे. तर, पंचायत समितीच्या १०० जागांपैकी भाजप ६३ आणि शिंदेसेना ३७ जागा लढविणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचाही महायुतीत सहभागी होण्याचा प्रस्ताव आल्यामुळे त्यांना देखील समाधानकारक जागा देण्यात येतील, अशी माहिती देतानाच जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे भाजप तीन वर्षे आणि शिंदेसेना दोन वर्षे, असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी रविवारी (१८) आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार नीलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिंदेसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे, राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सचिन वालावलकर, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
नारायण राणे म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजप पक्षाच्यावतीने जिल्हा परिषदेच्या ११, तर शिंदेसेना ६ जागा लढविणार आहे. तर, पंचायत समितीच्या भाजप १७ आणि शिंदेसेना १७ जागा लढविणार आहे. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात भाजप ४ आणि शिंदेसेना ११ जागा लढविणार आहे. तर, पंचायत समितीच्या भाजप १५ आणि शिंदेसेना १५ जागा लढविणार आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजप जिल्हा परिषदेच्या १६ आणि शिंदेसेना २, तर पंचायत समितीच्या भाजप ३१ आणि शिंदेसेना ५ जागा लढविणार आहे.
रत्नागिरीबाबत लवकरच निर्णय
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांनी भेट घेऊन माझ्याशी चर्चा केली आहे. रत्नागिरीत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. काहींनी अधिक जागांची मागणी केल्याने त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही राणे यांनी यावेळी सांगितले.