युद्धातून सुटका, मृत्यूला चकवा; १० दिवस 'सायरन'च्या छायेत, सावंतवाडीचे मसूरकर कुटुंब सुखरूप परतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 15:25 IST2026-03-12T15:25:00+5:302026-03-12T15:25:46+5:30
मायदेशात पाऊल ठेवताच या कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

युद्धातून सुटका, मृत्यूला चकवा; १० दिवस 'सायरन'च्या छायेत, सावंतवाडीचे मसूरकर कुटुंब सुखरूप परतले
सावंतवाडी : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात अचानक भडकलेल्या युद्धाच्या वणव्यामुळे आखाती देशांत अडकलेल्या पर्यटकांमध्ये सिंधुदुर्गच्या मसूरकर कुटुंबाचाही समावेश होता. गेल्या १० दिवसांपासून कुवेत आणि दुबई विमानतळावर मृत्यूच्या छायेत अडकलेले सावंतवाडीतील डॉ. प्रवीण मसूरकर, सुपुत्र कौस्तुभ आणि त्यांची पत्नी अखेर मंगळवारी (दि. १० मार्च) सुखरूप भारतात परतले. मायदेशात पाऊल ठेवताच या कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
२८ फेब्रुवारीला हे कुटुंब अमेरिकेला जाण्यासाठी निघाले होते. मात्र, कुवेतला पोहोचताच युद्ध सुरू झाले. इराणने कुवेत विमानतळाची धावपट्टी उद्ध्वस्त केल्याने परतीचे मार्ग बंद झाले. क्षेपणास्त्रांचा थरार आणि सायरनच्या आवाजात या कुटुंबाने हॉटेलमध्ये दिवस काढले. अखेर भारत सरकारचे प्रयत्न आणि सौदी अरेबियाचा व्हिसा मिळाल्याने, रस्ते मार्गाने प्रवास करून हे कुटुंब मुंबईत पोहोचले.
माणुसकीचे दर्शन
संकट काळात कुवेतमध्ये राहणाऱ्या सावंतवाडीच्या सुपुत्रांनी मसूरकर कुटुंबाला मोलाची साथ दिली. उभा बाजारचे प्रतिभा कारेकर, कोलगावचे आसिफ पटेल आणि निरुखेवाडीचे बांधव दररोज हॉटेलवर जाऊन मसूरकरांना धीर देत होते. सातासमुद्रापार दिसलेल्या या कोकणी माणुसकीमुळेच आमचा प्रवास सुसह्य झाला, अशा भावना डॉ. मसूरकर यांनी व्यक्त केल्या.
युद्धाचा थरार अन् सुटका
- २८ फेब्रुवारी : कुवेतमध्ये आगमन, युद्ध सुरू झाल्याने अडकले.
- हवाई हल्ला : डोळ्यांदेखत क्षेपणास्त्रांचा मारा अन् धावपट्टी उद्ध्वस्त.
- ९ मार्च : सौदी अरेबियाचा व्हिसा मिळाला अन् बसने प्रवास सुरू झाला.
- १० मार्च : विमानाने मुंबईत सुखरूप आगमन.