समुद्रमार्गे रो-रो सेवा १ सप्टेंबरपासून होणार सुरू, आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 16:14 IST2025-08-27T16:13:08+5:302025-08-27T16:14:32+5:30

मंत्री नितेश राणे यांची माहिती

Ro-Ro services from Mumbai to Ratnagiri Jaigarh and Mumbai to Sindhudurg Vijaydurg will start from September 1 | समुद्रमार्गे रो-रो सेवा १ सप्टेंबरपासून होणार सुरू, आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त

समुद्रमार्गे रो-रो सेवा १ सप्टेंबरपासून होणार सुरू, आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त

कणकवली : गणेशोत्सव, होळी अशा विविध सणांनिमित्त कोकणवासीय आपल्या मूळ गावी कोकणात जातात. त्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी राज्य शासनाने मुंबई ते रत्नागिरी (जयगड) आणि मुंबई ते सिंधुदुर्ग (विजयदुर्ग) अशी समुद्रमार्गे रो-रो सेवा सुरू केली आहे. सध्या हवामान खराब आहे. ते पूर्वपदावर येताच प्रत्यक्ष प्रवाशांसाठी ही रो-रो सेवा १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुंबई ते कोकण समुद्रामार्गे प्रवास करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रो-रो सेवेची माहिती त्यांनी मंगळवारी मुंबई येथील मंत्रालयात प्रसिद्धी माध्यमांना दिली. यावेळी कोकणवासियांना आणि पर्यटकांना या वाहतूक सेवेमुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.

ते म्हणाले, केंद्रीय शिपींग मंत्रालय आणि राज्याच्या बंदरे विभागाने या जलवाहतूक सेवेस अंतिम मंजुरी दिली आहे. या रो-रो सेवेसाठी अत्यावश्यक असणाऱ्या एकूण १४७ परवानग्या प्राप्त झाल्या असून, यामुळे कोकणवासियांचा अतिशय सुरक्षित व जलद प्रवास होणार आहे. हवामानाच्या बदलामुळे मच्छीमारांनाही समुद्रात जाण्यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याने हवामान सुरळीत होताच प्रत्यक्ष प्रवाशांसाठी ही रो-रो सेवा १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

भाऊचा धक्का ते जयगड तीन तास तर भाऊचा धक्का ते विजयदुर्ग पाच तास प्रवास करता येणार आहे. येथे जेट्टीची सुविधा असून, जेट्टीवरून शहरात जाण्यासाठी बसेसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. २५ नॉट्स स्पीडची ही एम टू एम नावाची रो-रो बोट असणार आहे. जी दक्षिण आशियातील वेगवान बोट आहे. यामध्ये इकोनॉमी वर्गात ५५२ आसनांची व्यवस्था, प्रिमीयम इकोनॉमी मध्ये ४४, बिझनेसमध्ये ४८, तर फर्स्ट क्लासमध्ये १२ प्रवाशांची क्षमता असणार आहे. तर, ५० चारचाकी, ३० दुचाकी क्षमता असलेली ही रो-रो आहे.

बसच्या आसन क्षमतेप्रमाणे दर वाढणार

यासाठी कोकणवासियांना इकोनॉमी क्लाससाठी दोन हजार ५०० रुपये दर आकारला जाणार आहे. तर, प्रिमियम इकोनॉमीसाठी प्रवाशांसाठी चार हजार रुपये, बिझनेस क्लाससाठी सात हजार ५००, फर्स्ट क्लाससाठी नऊ हजार रुपये दर आकारला जाणार आहे. तसेच, चारचाकीसाठी ६ हजार दर, दुचाकीसाठी एक हजार दर, सायकलसाठी ६०० दर, मिनी बससाठी १३ हजार आणि बसच्या आसन क्षमतेप्रमाणे दर वाढत जाणार आहेत. भविष्यात श्रीवर्धन, मांडवा असे विविध थांबे असणार आहेत, तर त्यासाठी जेट्टीही तयार करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री राणे यांनी यावेळी दिली.

Web Title: Ro-Ro services from Mumbai to Ratnagiri Jaigarh and Mumbai to Sindhudurg Vijaydurg will start from September 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.