Sindhudurg: संततधार पावसाने काही रस्ते पाण्याखाली, वाहतूक झाली होती ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:15 IST2025-06-17T16:15:02+5:302025-06-17T16:15:25+5:30
कणकवली तालुक्यात नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ

Sindhudurg: संततधार पावसाने काही रस्ते पाण्याखाली, वाहतूक झाली होती ठप्प
कणकवली : कणकवली शहरासह तालुक्यात गेले दोन दिवस जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर येऊन शेजारील रस्त्यावर आल्याने काही काळ ते रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते.
पाऊस थांबल्यावर पाणी ओसरल्याने रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली. सोमवारी दिवसभर अधून मधून किरकोळ सरी कोसळत असल्या तरी पावसाने तशी उसंतच घेतली होती. रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील जानवली, गडनदी तसेच अन्य नद्यांची पात्रे तुडुंब भरून वाहत होती. काही ठिकाणी पात्राबाहेर पुराचे पाणी आले होते.
तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर सदृश पाणी आल्याने आजूबाजूच्या परिसराला पाण्याचा वेढा पडला होता. तर काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी दुपारनंतर पाणी बऱ्यापैकी ओसरले होते. खबरदारी म्हणून महसूल विभागाबरोबरच पोलिस प्रशासन देखील विविध ठिकाणी सक्रिय होते.
कणकवली आचरा मार्गावर वरवडे फणसवाडी येथे सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला होता. अर्थात या रस्त्यावरील पुलाचे काम पूर्ण न झाल्याने काही प्रमाणातच दुचाकी तसेच चारचाकी त्या मार्गावरून जात असतात. त्या मार्गावरून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू झालेली नाही. दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास वरवडे येथील रस्त्यावर आलेले पाणी ओसरले. मात्र काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, सोमवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने पूरस्थिती पूर्वपदावर आली होती.
शालेय बसफेरी पर्यायी मार्गाने वळविली
हळवल गावातील भाकरवाडी-शिवडाव जोडणाऱ्या रस्त्यावर पाणी आले होते. सोमवारी सकाळी ९:१५ वाजण्याच्या सुमारास काहीसे पाणी कमी झाले होते. मात्र मार्गावरील वाहतूक ठप्प होती. सोमवारपासून शाळा देखील सुरू झाल्या. मात्र रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे शालेय बसफेरी देखील पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
पुराचे पाणी रस्त्यावर, वाहतूक काही काळ ठप्प
सोमवारी सकाळी हरकुळ बुद्रूक भाट दुकान नजीक पुलावरून पाणी वाहत होते. जानवली व गडनदी दुथडी भरून वाहत होती. त्यामुळे जानवली नदीवरील गणपती सान्यावरही पाणी वाढले होते. तर शिवडाव, हळवल या ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.