दर तीन महिन्यांनी आरोग्य कॅम्प, सिंधुदुर्गच्या आरोग्य सेवेला मिळणार बळकटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:31 IST2026-02-19T16:29:54+5:302026-02-19T16:31:09+5:30
पालकमंत्री नितेश राणे यांची संकल्पना; बांबोळीचे अवलंबित्व संपवण्यासाठी ठोस पाऊल

दर तीन महिन्यांनी आरोग्य कॅम्प, सिंधुदुर्गच्या आरोग्य सेवेला मिळणार बळकटी!
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या त्रुटींमुळे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे सर्वसामान्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी आता पालकमंत्री नितेश राणे यांनी कंबर कसली आहे. "जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी गोव्याला धाव घ्यावी लागू नये, यासाठी आता दर तीन महिन्यांनी भव्य आरोग्य कॅम्प आयोजित करण्यात येईल," अशी महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्र्यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने अनेकदा गंभीर रुग्णांना तातडीने गोवा (बांबोळी) येथे पाठवावे लागते. या प्रवासात होणारी ओढाताण आणि आर्थिक भुर्दंड थांबवण्यासाठी पालकमंत्र्यांनी ही नवी आरोग्य मोहीम आखली आहे.
गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा आधार
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था केवळ कागदोपत्री न सुधारता, ती प्रत्यक्ष जमिनीवर उतरवण्यासाठी ही पालकमंत्र्यांची विशेष संकल्पना आहे. दर तीन महिन्यांनी नामवंत तज्ज्ञ डॉक्टर जिल्ह्यात आणून, त्यांच्या माध्यमातून रुग्णांना तपासणी आणि मोफत औषधे उपलब्ध करून दिली जातील. या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.
रिक्त पदे भरण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा
जिल्ह्यात डॉक्टरांची आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत, ज्यामुळे सध्याच्या यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. आगामी बजेट अधिवेशनात हा मुद्दा प्रकर्षाने मांडून, टप्प्याटप्प्याने ही रिक्त पदे भरण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. यामुळे जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था कायमस्वरूपी सक्षम होण्यास मदत होईल.
जनतेतील नाराजी आणि तक्रारींची दखल
आरोग्य सुविधांच्या अभावामुळे नागरिकांमध्ये असलेल्या असंतोषाची पालकमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. आता दर तीन महिन्यांनी या उपक्रमाचा आढावा घेतला जाईल. आरोग्य सेवेबाबत सर्वसामान्यांच्या ज्या काही तक्रारी असतील, त्या थेट ऐकून घेऊन त्यावर तातडीने मार्ग काढला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रुग्णांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे उद्दिष्ट - डॉ. श्रीपाद पाटील
"शासकीय आरोग्य यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबवला जात आहे. जिल्ह्यातील रिक्त पदांचा प्रश्न सुटेपर्यंत अशा कॅम्पच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देणे हा उत्तम पर्याय आहे. जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य विभाग या मोहिमेसाठी पूर्णतः सज्ज असून, जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत ही सेवा पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे."