दोडामार्ग : दोडामार्ग सीमेवरून गोव्यात माघारी पाठविलेल्या सिंधुदुर्गातील ३४ युवक-युवतींना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रविवारी जिल्ह्यात प्रवेश दिला. दोडामार्ग सीमेवर आल्यानंतर प्रत्येक तालुक्यातील असलेल्यांना त्या तालुक्यात पाठविण्यात आले व विलगीकरणात कक्षात ठेवले आहे.गोवा-फोंडा वेर्णा येथे काम करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३४ युवक-युवती आंतरराज्य प्रवेश बंद झाल्याने गोवा येथे अडकून पडले होते. याकडे शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी लक्ष वेधून या सर्वांना त्यांच्या मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणण्यासाठी पुढाकार घेतला. शनिवारी दोडामार्ग सीमेवर त्यांना आणले होते.
मात्र, आंतरराज्य प्रवेश बंदी असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाशिवाय प्रवेश दिला जाणार नाही असे सांगून पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांनी प्रवेश करू दिला नाही. त्यामुळे गोवा शासनाने त्यांना परत नेत आपल्या निगराणीखाली ठेवले. त्यामुळे विरोधकांनी धुरी यांच्यावर टीका केली.मात्र, बाबुराव धुरी यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी त्या युवक युवतींना माघारी आणण्याचा ध्यास धरला. आमदार दीपक केसरकर, शिवसेना खासदार विनायक राऊत, यांच्याशी तसेच प्रशासनाकडे प्रयत्न सुरू ठेवले होते. त्या सर्वांना जिल्हा प्रवेश देण्याची अधिकृत परवानगी घेतली. त्यानुसार रविवारी त्या ३४ जणांना जिल्हा प्रवेश देण्यात आला.
प्रशासनाच्या वाहनाने दुपारी ३ वाजता दोडामार्ग येथे आणून त्यांची आरोग्य तपासणी करून ते ज्या तालुक्यातील होते त्या तालुक्यात पाठवून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच ते शासनाच्या निगराणीखाली रहाणार असल्याचे सांगण्यात आले. धुरी यांनी त्या युवक-युवतींना दिलेला शब्द खरा करून टीका करणाऱ्यांचे तोंड बंद केले आहे. गोवा येथे अडकून पडलेल्या त्या ३४ युवक-युवतींना प्रशासनाच्या वाहनाने सिंधुदुर्गच्या सीमेत आणण्यात आले.