सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३३ समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम, १,७७९ किलो कचरा गोळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 16:03 IST2026-01-03T16:03:11+5:302026-01-03T16:03:45+5:30
१,०३५ किलो प्लास्टिक कचऱ्याचा समावेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३३ समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम, १,७७९ किलो कचरा गोळा
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३३ समुद्रकिनाऱ्यांवर एकाच दिवशी राबविण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्वच्छता मोहिमेत एकूण १,७७९ किलो कचरा गोळा करण्यात आला. यामध्ये १,०३५ किलो प्लास्टिक कचऱ्याचा समावेश असून, या उपक्रमात जवळपास ९०० हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यटन जिल्ह्याचा आरसा असलेले समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून १ जानेवारी २०२६ रोजी श्रमदानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय उपक्रमाचा शुभारंभ ग्रामपंचायत मेढा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सरपंच अवधूत रेगे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, कृषी अधिकारी दिंगशांत कोळप, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे कार्यक्रम व्यवस्थापक संतोष पाटील, शरद शिंदे, तसेच रूपाजी किनळेकर, मनीष पडेत, स्नेहल पिंगुळकर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर म्हणाले, स्वच्छ समुद्रकिनारे हा जिल्ह्याचा आरसा आहे. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा असल्याने येथे येणारे देशी-विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर समुद्रकिनाऱ्यांना भेट देतात. स्वच्छ व सुंदर किनारे उपलब्ध करून दिल्यास भविष्यात पर्यटकांची संख्या अधिक वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ३३ समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता करण्यात आली. यात देवगड तालुका : १३ समुद्रकिनाऱ्यांवर ४०३ नागरिकांच्या सहभागातून ५०० किलो कचरा, मालवण तालुका : ९ समुद्रकिनाऱ्यांवर १६३ नागरिकांच्या उपस्थितीत ९२३ किलो, वेंगुर्ला तालुका : ११ समुद्रकिनाऱ्यांवर ३३७ नागरिकांच्या सहभागातून ३५६ किलो कचरा या मोहिमेत संकलित झालेल्या कचऱ्याची ग्रामपंचायतींच्या माध्यमातून योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘स्वच्छ किनारे, समृद्ध पर्यटन’ हा संदेश जिल्हाभर पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.