चंद्रकांतदादांच्या दौऱ्यापूर्वी बांधकाम अधिकाऱ्यांची करणी, रातोरात गायब झाले खड्डे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 11:36 AM2018-08-31T11:36:01+5:302018-08-31T11:37:14+5:30

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या महामार्गाची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हे आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करत आहेत.

Chandrakant Patil Visit National highway 66 News | चंद्रकांतदादांच्या दौऱ्यापूर्वी बांधकाम अधिकाऱ्यांची करणी, रातोरात गायब झाले खड्डे

चंद्रकांतदादांच्या दौऱ्यापूर्वी बांधकाम अधिकाऱ्यांची करणी, रातोरात गायब झाले खड्डे

Next

- अनंत जाधव 
सावंतवाडी - पावसाळ्यात कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या महामार्गाची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हे आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करत आहेत. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यापूर्वीच सावंतवाडीत सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी कार्यक्षमतेची करणी करून सावंतवाडी ते झाराप या मार्गावरील खड्डे रातोरात बुझवले आहेत.  

चंद्रकांतदादा सिंधुदुर्गात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ते तुम्हीच सांगा. कारण दरवर्षी खड्डे भरायला लाखो रूपये खर्च करून भरलेले खड्डे पावसात वाहून जात असतील तर ही वरवरची मलमपट्टी करून सिंधुदुर्गवासीयांच्या डोळ्यात धुळफेक कशासाठी करता, असा सवाल आता सर्व सामान्य जनता उपस्थीत करीत आहे. सावंतवाडी कोलगाव तसेच आंबोली रस्त्यावर दरवर्षी खड्डे भरण्यास लाखो रूपये खर्च करून हे खड्डे जैसे थे आहेत. याला जबाबदार कोण? चंद्रकांतदादाच्या दौऱ्याचे फलित म्हणजे एका रात्रीत खड्डे गायब झाले आहेत.

गणेश चतुर्थाे आली की गल्लीपासून मुंबईपर्यंतची बांधकामची यंत्रणा खडबडून जागी होते. आणि रस्त्यावरचे खड्डे भरण्यास सुरूवात करते. दोन वर्षापासून राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे गणेश चतुर्थी हा कोकण वासियांचा महत्वाचा सण असल्याने मुंबई ते सावंतवाडी असा दौरा करतात आणि रस्त्याची पाहाणी करतात. पण चंद्रकांतदादानी पाहणी केल्यानंतर अधिकाºयांची धावपळ होते आणि रस्त्यावरचे खड्डे लगबगीने बुजवले जातात आणि बांधकाममंत्र्यांना खूष केले जाते.
पण बांधकाममंत्री जिल्ह्यातून गेले की आठवड्यात खड्डे जैसे थे. आतापर्यंत अनेकवेळा बांधकाममंत्र्यानी खड्डे भरण्याच्या डेटलाईनही दिल्या पण खड्डेच भरले जात नसल्याने डेटलाईन तरी कशासाठी, असा सवाल आता उपस्थित होत आहे. सावंतवाडी शहराला जोडणाºया कोलगाव आंबोली व माजगाव या तीन्ही रस्त्यावरचे खड्डे दरवर्षी बुजवले जातात. पण गणेशचतुर्थी पूर्वी चाकरमान्यांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो तो लागतोच. झाराप ते पत्रादेवी महामार्ग अस्तित्वात आल्यानंतर २०१३ ते १४ च्या दरम्यान सावंतवाडी झाराप हा रस्ता महामार्ग विभागाकडून तो बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला. पण हा रस्ता महामार्ग विभागाकडे असताना पाच वर्षापूर्वी पाच कोटी रूपये खर्च करून रस्ता करण्यात आला होता. पण हा रस्ता अवघ्या तीन वर्षात खड्ड्यात गेला. त्यानंतर बांधकाम विभाग लाखो रूपये खर्च करून पावसाळ्यात खड्डे भरत आहे आणि वाहून जात आहेत.
तर दुसरा रस्ता सावंतवाडीचे प्रवेशद्वार मानले जाणाºया आंबोली रस्त्यावरही तीच परस्थिती आहे. चार वर्षापूर्वी हा रस्ता करण्यात आला पण आता हा रस्ता कुठे होता ते शोधावे लागत आहे. पर्यटन दृष्ट्या महत्वाचा असणारा हा रस्ता पावसाळ्यात खड्ड्यात असतो पण त्यावर ही खड्डे भरण्याची तात्पूरती मलमपट्टी केली जाते. हे खड्डे भरण्यासाठी दरवर्षी लाखो रूपये खर्च केले जातात. पण आता जेवढे पैसे खड्डे भरले जातात त्यात रस्ते झाले असते असे अधिकारीच सांगत आहेत.
सावंतवाडी-बांदा मार्गावरील माजगाव येथे ही हीच परस्थिती आहे. बांधकाम विभागाला खड्डे भरणे म्हणजे एक प्रकारे भ्रष्टाचाराचे कुराणच आहे. दरवर्षी लाखो रूपये खर्च करायचे आणि त्यात खड्डे भरायचे याचा हिशेब ना सरकारकडे असतो ना बांधकामकडे त्यामुळे खड्डे पडणे बांधकामसाठी चांगले असले तरी सामान्य माणसाला प्रवास करतना त्रासदायकच असते.
कोलगाव ते सावंतवाडी मार्गावर एक किलोमीटरमध्ये अंदाजे १८३ लहान मोठे खड्डे आहेत. या खड्यातून अवजड वाहने सोडाच कार चालवणेही दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे. यातून अनेक अपघात सोडाच लोकांनीही आता कोलगाव मार्गावरून कणकवलीकडे प्रवास करण्यापेक्षा रेल्वेने कणकवलीला जाणे पसंत करत आहेत. त्यामुळे  बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी कोकणात येत आहेत. कदाचित ते येण्यापूर्वी खड्डे भरून मलमपट्टी केली जाईल पण ही मलमपट्टी निदान गणेशचतुर्थाेपर्यंत तरी टिकावी, अशी अपेक्षा येथील जनतेची आहे.


 
 जांभा दगड अपघातास निमंत्रण

बांधकाम विभाग लगबगीने खड्डे बुजविण्यासाठी जांभा दगड वापरत आहेत. पण हा जांभा दगड पहिल्याच पावसात वाहून जातो आणि चिखल होतो. या जांभा दगडाची माती होत असल्याने आणखी अपघातास निमंत्रण दिले जाते, यावर विचार होणे गरजेचे मानले जात आहे.
 
  कोलगाव रस्ता पाच वर्षापासून बांधकामकडे
झाराप-पत्रादेवी महामार्ग अस्तित्वात आल्यानंतर झाराप ते आयी हा रस्ता बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला. त्यापासून आतापर्यंत हा रस्ता नव्याने करण्यात आला नाही. फक्त या रस्त्यावरचे खड्डे भरण्यात आले आहेत. आता नव्याने या रस्त्यासाठी ११२ कोटींची निर्विदा भरण्यात आली आहे. मात्र निर्विदा कोण भरण्यास ठेकेदार पुढे येत नाही, असे मत बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियता अनिल आवटी यांनी व्यक्त केले.
 
एका रात्रीत खड्डे गायब
बांधकाममंत्री सिंधुदुर्ग दौ-यावर येण्याच्या पार्श्वभूमीवर एका रात्रीत झाराप ते सावंतवाडीपर्यंतचे खड्डे अचानक गायब झाले. याबाबतचे आश्चर्य खुद्द सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले. साळगावकर हे गुरूवारी ओरोस येथे गेले होते. तेथून परतताना त्यांना हा आश्यर्यचकीत करणारा अनुभव आला. बांधकाममंत्री सिंधुदुर्गात येतात म्हणून खड्डे भरले गेलेत की काय, असा सवालही त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

Web Title: Chandrakant Patil Visit National highway 66 News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.