सिंधुदुर्ग किल्ल्यावर चक्कर येऊन रत्नागिरीतील बालिकेचा मृत्यू, शिवजयंतीनिमित्त फिरण्यासाठी आली असता काळाचा घाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:23 IST2026-02-20T16:22:40+5:302026-02-20T16:23:56+5:30
किल्ल्यावर भर उन्हात फिरत असताना ती चक्कर येऊन जमिनीवर कोसळली

संग्रहित छाया
मालवण : येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त फिरण्यासाठी आलेल्या अस्मी मनोहर गोविलकर (रा रत्नागिरी) या दहा वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
रत्नागिरी येथून विद्यार्थी व पालक यांचा २५ ते ३९ जणांचा समूह गुरुवारी सकाळी शिवजयंती निमित्ताने मालवणच्या किल्ले सिंधुदुर्गवर फिरण्यासाठी आला होता. या ग्रुपमध्ये अस्मी गोविलकर ही शाळकरी मुलगी आपल्या आईसमवेत सहभागी झाली होती.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर भर उन्हात फिरत असताना ती चक्कर येऊन जमिनीवर कोसळली. तिला पालकांनी तत्काळ होडीने मालवणात आणत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
अस्मीच्या अकाली मृत्यूमुळे तिची आई मोहिनी गोविलकर यांना धक्का बसला आहे. अस्मीला लहानपणापासून हृदयाचा आजार होता असे तिच्या आईने वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले.