99th Marathi Sahitya Sammelan: शाहू महाराजांवर संशोधनात्मक लेखन करणार - विश्वास पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 17:03 IST2026-01-05T17:03:12+5:302026-01-05T17:03:54+5:30
माहिती न घेणाऱ्यांमुळे वातावरण बिघडते

99th Marathi Sahitya Sammelan: शाहू महाराजांवर संशोधनात्मक लेखन करणार - विश्वास पाटील
छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी सातारा : साताऱ्याचे थोरले शाहू महाराज आणि दुसरे प्रतापसिंह महाराज हे दोन महाराज माझे फार आवडते आहेत. थोरले शाहू महाराजांवर संशोधनात्मक लेखन करणे हे माझे कर्तव्य असून ते मी पूर्ण करेन, असा विश्वास साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणूस टिकावा, वाढवा आणि समृद्ध व्हावा, यासाठी आपण वेगळा विचार करायला हवा. आपल्या वापरात ही भाषा आवर्जून राहील, याचा कटाक्ष मराठी माणसाने ठेवावा. आपण साहित्यिक आणि सहिष्णू पद्धतीने ही लढाई लढत आहोत, पण गरज पडली, तर मायमराठीसाठी मराठी माणूस रस्त्यावर उतरून लढू शकतो, हे दाखवून दिले आहे.
वाचा: ‘लोकमत’च्या वृत्तानंतर संमेलनाध्यक्षांच्या पत्नीचा सन्मान!, समारोप सोहळ्यात व्यासपीठावर स्थान
मराठी माणसाच्या जिव्हाळाचा विषय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता शहाजी महाराज यांची समाधी कर्नाटकात आहे. तिची अवस्था फार वाईट आहे. त्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखविली आहे. कोट्यवधी खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे आपण बांधतो, पण त्यांच्या पित्याच्या समाधीची दुरवस्था होणे ही लाजिरवाणी बाब असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.
माहिती न घेणाऱ्यांमुळे वातावरण बिघडते
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी लिहिताना, बोलताना मी प्रचंड अभ्यास केलेला असतो, पण हल्ली लोक त्यावर व्यक्त होताना कोणतीही माहिती न घेता उगाच बडबडत असतात. त्यामुळे वातावरण बिघडते. छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अनेक साहित्यकृतीतून विष पसरवले गेले होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी शिवाजी सावंत यांची ‘छावा’ आणि माझी ‘संभाजी’ ही कादंबरी महत्वाची ठरली. आमच्या या योगदानाची कोणी दाखल घेणार आहे की नाही? असा सवालही विश्वास पाटील केला.