म्हसवड : म्हसवड नगरपरिषदेच्या हद्दीतील सातारा-पंढरपूर रोड लगत असलेल्या खाणीतील साचलेल्या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेने तत्काळ या दूषित दुर्गंधीयुक्त पाण्याचा निचरा करावा, अन्यथा २५ जानेवारीली नगरपालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक विकास गोंजारी यांनी दिला आहे.
म्हसवडचे नगरसेवक विकास गोंजारी यांनी निवेदनात म्हटले आहे की, अनेक वेळा मागणी करूनही टाळाटाळ केल्यामुळे उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे काही झाल्यास त्याला नगरपालिका जबाबदार राहील. रामोशी नाकाजवळील खाणीतील दूषित पाणी बाहेर काढावे. त्याप्रमाणे म्हसवड बसस्थानकामध्ये शहरातील येणारे घाण पाण्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी पालिकेने त्वरित पाण्याची विल्हेवाट लावावी, तसेच नगरपालिका शेजारी नवीन भाजीमंडई इमारतीचे काम जवळपास पूर्णत्वास जाऊनही गेली चार वर्ष वापरा विना पडून आहे. या ठिकाणी दोन नंबरचे व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. तरी पालिकेने त्वरित माजी मंडई सुरू करावी, गेले चार वर्षांपासून पालिकेच्या मालकीचे २५ ते ३० गाळे मोकळे पडून आहेत तरी त्या गाळ्याचे त्वरित लिलाव करावेत, तसेच शिक्षक कॉलनी ते बाजार समिती कार्यालयासमोरील गटारबांधकाम तातडीने करावे, शहरातील अपुरे गटर्स बांधकाम पूर्ण करावीत या मागणीसाठी २५ जानेवारीला उपोषण करणार आहे.
निवेदनावर काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विश्वंभर बाबर, माजी उपसभापती विजय बनसोडे, बाबासाहेब माने, अनिल लोखंडे, नीलेश काटे यांच्या सह्या आहेत.