Satara ZP: शेवटचाच मुहूर्त; २० तारखेपर्यंत भाजपची सत्तेसाठी कसरत
By प्रमोद सुकरे | Updated: March 10, 2026 19:06 IST2026-03-10T19:04:07+5:302026-03-10T19:06:02+5:30
दोस्तीत कुस्ती पण जिंकणार कोण?

संग्रहित छाया
प्रमोद सुकरे
कराड : सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागून आता महिना लोटला आहे. दरम्यान, २५ फेब्रुवारीलाच ग्रामविकास विभागाने २० मार्चपूर्वी पदाधिकारी निवडी घेण्याचे परिपत्रक धाडले आहे. पण जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क शेवटचाच मुहूर्त काढलाय. त्यामुळे २० मार्चला होणारी पदाधिकारी निवड म्हणजे भाजपला शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्याची मिळालेली, दिलेली संधी आहे काय? याबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत.
मिनी विधानसभा म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक गत महिन्यात झाली. त्याचा निकाल ९ फेब्रुवारीला जाहीर झाला. पण त्याच्या निवडी रखडल्याने सर्वच राजकीय पक्षांचे नेते, नूतन जिल्हा परिषद सदस्य जणू गॅसवरच आहेत. आता तर निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट शेवटचाच मुहूर्त काढलाय. त्यामुळे राजकीय हालचाली वाढल्या असून नेमकी सत्ता कोण स्थापन करणार याची उत्सुकता ताणली आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा देत एकहाती सत्ता आणण्याची सिंहगर्जना केली. मात्र त्यांचे घोडे मध्येच अडले. तर हातात हात घालून निवडणुकीला सामोरे गेलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेना या दोघांनी मिळून सत्तेची मॅजिक फिगर गाठली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वात जास्त आमदार, मंत्री असलेल्या भाजपमधील अस्वस्थता वाढली असून ती लपून राहिलेली नाही.
दोस्तीत कुस्ती पण जिंकणार कोण?
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी मैत्रीपूर्ण लढत म्हणत महायुतीतील तीन पक्षात दोस्तीत कुस्ती सुरू झाली. पण ही कुस्ती निकालानंतरही थांबलेली नाही. भाजपचे नेते ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट बहुमत नसतानाही भाजपचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होणार असा दावा केल्याने मित्रपक्षांच्यात तणाव वाढला.
त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘होय महायुतीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल’ असे म्हणत गुगलीही टाकली तर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्येही महायुतीचा अध्यक्ष उपाध्यक्ष व्हावा अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, असे मत व्यक्त करीत याबाबत मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी आम्ही करू असे म्हटले आहे. पण या साऱ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी मात्र मौन बाळगले आहे. त्यामुळे दोस्तीत सुरू झालेली ही कुस्ती नेमकी कोण जिंकणार? हे पहावे लागणार आहे.
असले ‘टूरवर’ तरी मनी ‘हुरहूर’
भाजपच्या आपरेशन ‘लोटस’च्या धास्तीने राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेना यांनी सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य टूरवर धाडले आहेत. त्याला आता १५ दिवस लोटले आहेत. राष्ट्रवादी व शिंदेसेनेचे सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी असले तरी त्यांची चांगली बडदास्त ठेवण्यात आली असल्याचे सूत्रांकडून समजते. पण समाज माध्यमातून त्यांना देखील वेगवेगळ्या राजकीय बातम्या समजत आहेत. त्यामुळे टूरवर असलेल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांच्या मनातही निवडी बाबतची हुरहूर असल्याची भावना एकाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.
‘रामकृष्णां’वर ‘रामबाण’ उपाय..
भाजपचे नेते रामकृष्ण वेताळ हे पत्नी विद्याताई वेताळ यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. पण उमेदवारी नाकारल्याने त्यांनी पत्नीला अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. दरम्यान, भाजपच्या किसान मोर्चाचे सरचिटणीस असलेल्या रामकृष्ण वेताळ यांची निवडणुकीपूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पण निकालात कोपर्डे गटातून ‘ताईं’नी गुलाल घेतला. त्यामुळे नाराज वेताळ नेमकी काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागून होते. भाजप पक्षश्रेष्ठींनी ‘त्याच’ रामकृष्णांना किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष बहाल करत ‘रामबाण’ उपाय काढला. त्यामुळे अपक्ष विद्या वेताळ पुन्हा भाजप सोबतच दिसत आहेत.
असे आहे बलाबल...
- भाजप २७
- राष्ट्रवादी (अजित पवार) २०
- शिंदेसेना १५
- काँग्रेस १
- शेतकरी संघटना १
- अपक्ष १