Satara: येरळा धरणाच्या नदी पात्रातील पुलावरचा रस्ता खचला, वाहतूक बनली धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 12:47 IST2025-06-02T12:42:50+5:302025-06-02T12:47:09+5:30
बनपुरी येथील शेतकऱ्यांना शिवारात जाण्यासाठी कोंडी

Satara: येरळा धरणाच्या नदी पात्रातील पुलावरचा रस्ता खचला, वाहतूक बनली धोकादायक
विठ्ठल नलवडे
कातरखटाव : पाण्याच्या वेगामुळे येरळा धरणाच्या नदी पात्रातील पुलावरचा रस्ता खचला. यामुळे या पुलावरुन वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. खटाव तालुक्यातील बनपुरी येथील शेतकऱ्यांना शिवारात जाण्यासाठी कोंडी झाली आहे.
अवकाळी पावसाच्या दमदार हजेरीमुळे ओढे, नाले, नदी, येरळा धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. येरळा धरणाच्या सांडव्यातून नदी पात्रात अतिवेगाने पाणी वाहत आहे. पाण्याच्या वेगामुळे नदी पात्रातील पुलावरचा रस्ता खचला आहे. सिमेंटचे कठडे तुटले आहेत. कठडे, मुरूम पाण्याच्या प्रवाहाने वाहुन गेल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
पुलाची उंची कमी असल्याने पुलावर पाणी आले की बनपुरी-अंबवडे गावचा मार्ग बंद होतो. बनपुरी येथील गावकऱ्यांची शेती नदी पात्राच्या पलीकडे असल्याने पाणी ओसरल्यानंतरच शेतात जावे लागते. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
येरळा धरणाच्या नदी पात्रातील पुलावरुन धोका पत्करून ये-जा करावी लागत आहे. पुलाची बिकट अवस्था झाल्याचे पुलाची उंची वाढवावी हाच एकमेव पर्याय आहे.- दिलीप पाटोळे, शेतकरी बनपुरी