साताऱ्याने ४१ अंशाचा टप्पाही पार केला; माण तालुक्यात उष्माघाताचा बळी
By नितीन काळेल | Updated: April 16, 2026 22:07 IST2026-04-16T22:07:26+5:302026-04-16T22:07:41+5:30
Satara Heat Wave news: दोन वर्षांतील उच्चांकी तापमान : जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम; कमाल तापमान ४० अंशावरच...

साताऱ्याने ४१ अंशाचा टप्पाही पार केला; माण तालुक्यात उष्माघाताचा बळी
- नितीन काळेल
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून मागील पाच दिवसांपासून बहुतांशी भागाचा पारा ४० अंशावर कायम आहे. तर सातारा शहरातील कमाल तापमानाने ४१ अंशाचा टप्पाही पार केला. गुरूवारी ४१.२ अंशाची नोंद झाली. हे मागील दोन वर्षांतील उच्चांकी तापमान ठरले आहे. तर माण, खटाव तालुक्यातील पारा ४३ अंशाच्या घरात गेला आहे. तसेच माण तालुक्यात गुरूवारी एका शेतकऱ्याचा उष्माघाताने बळी गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सातारा जिल्ह्यात यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढली होती. मार्च महिन्यातही कमाल तापमान ३८ अंशावर गेले होते. तर एप्रिल महिना मागील काही वर्षातील कडक उन्हाळ्याचा ठरला आहे. कारण, एप्रिलच्या मध्यावरच पारा ४० अंशावर पोहोचला. तसेच दररोजच कमाल तापमानात वाढ होत चालली आहे. सातारा शहराचे तापमान एप्रिल महिन्याच्या शेवटात किंवा मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ४१ अंशापर्यंत जाते. पण, यंदा एप्रिलच एकदम ‘हाॅट’ ठरला आहे. मागील पाच दिवसांत जिल्ह्याच्या बहुतांशी भागाचा पारा ४० अंशावर कायम आहे. सातारा शहरात तर १२ एप्रिलपासून ४० अंशावर कमाल तापमान आहे. गुरूवारी तर सातारा शहरात ४१.२ अंशाची नोंद झाली. यामुळे उष्णतेची लाट तीव्र होताना दिसून येत आहे.
शेळ्या राखण्यासाठी गेल्यावर चक्कर अन् मृत्यू...
माण तालुक्यातील पारा ४३ अंशापर्यंत गेला आहे. त्यामुळे याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. त्यातच कडक ऊन असतानाही शेतकरी दुपारीही काम करतात. तसेच उन्हातच पशुधनाची राखण करतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अशातच माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील शेतकरी हणुमंत काशीनाथ चव्हाण (वय ७०) यांचा उष्माघाताने बळी गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चव्हाण हे गुरूवारी सकाळी शेतात शेळ्या राखण्यासाठी गेले होते. त्यावेळी थकवा जाणवल्याने झाडाखाली बसले. पण, चक्कर येऊन ते जमिनीवर पडले. नातेवाईकांनी बेशुध्दावस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. पण, डाॅक्टरांनी तपासणीनंतर मृत झाल्याचे सांगितले.