सह्याद्रीत वाघांचे 'स्वराज्य'; सेनापती, सुभेदार अन् बाजी!; लोकसहभागातून केले नामकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 15:50 IST2025-09-26T15:48:22+5:302025-09-26T15:50:51+5:30
स्थानिक नागरिकांकडून व्याघ्र अभिमानाचे दर्शन

सह्याद्रीत वाघांचे 'स्वराज्य'; सेनापती, सुभेदार अन् बाजी!; लोकसहभागातून केले नामकरण
कराड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातील स्थानिक नागरिकांनी आपल्या व्याघ्र अभिमानाचे दर्शन घडवत वाघांना ‘सेनापती, सुभेदार अन् बाजी’ अशी लोकप्रिय नावे दिली आहेत. या नावांमुळे स्थानिक लोकांचा वाघांशी असलेला आत्मीय संबंध व आपुलकीची भावना अधिक दृढ झाली. त्यामुळे वन्यप्राणी संवर्धनाबरोबरच लोकसहभागाची भावना बळकट हाेत चालली आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अधिवास करणाऱ्या वाघांचे नामकरण लोकसहभागातून करण्यात आले आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सरदारांना दिलेल्या विविध पदव्यांचा आधार घेण्यात आला आहे. शासकीय कागदपत्रांमध्ये व्याघ्र प्रकल्पातील वाघांना सांकेतिक क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र, पर्यटकांमध्ये वाघाविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी स्थानिक निसर्गप्रेमी, मार्गदर्शक (गाइड) आणि वनमजुरांकडून या वाघांसाठी वापरण्यात येणाऱ्या नावांना वन विभागाने स्वीकारले आहे.
असे झाले लोकसहभागातून नामकरण..
सद्य:स्थितीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ३ नर वाघ आहेत. २०१८ सालानंतर २०२३ पर्यंत म्हणजे ५ वर्षांनंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाची नोंद झाली. या वाघाची ओळख न पटल्याने त्याचा सांकेतिक क्रमांक एसटीआर टी १ असा देण्यात आला. कोल्हापूरच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये २३ एप्रिल २०२२ रोजी पहिल्यांदाच टिपलेला आणि १३ एप्रिल २०२४ रोजी त्या ठिकाणीच राहिलेला नर वाघ हा १०० किलोमीटर दूरवर असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात २८ ऑक्टोबर २०२४ रोजी पुन्हा टिपला गेला. त्याचा सांकेतिक क्रमांक एसटीआर-टी २ असा ठेवण्यात आला आहे.
त्यानंतर २०२३ मध्ये कोल्हापूरच्या कडगाव वनपरिक्षेत्रात टिपलेला नर वाघ २०२५ रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आल्यामुळे त्याला एसटीआर-टी ३ असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला आहे. हाच वाघ कोकणातून चिपळूण वनपरिक्षेत्रातदेखील जाऊन आला होता. शासकीय कागदपत्रांमध्ये या वाघांची ओळख सांकेतिक क्रमांकानुसार नोंदविण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर पर्यटकांमध्ये या वाघांविषयी आकर्षण व लोकसहभाग वाढविण्यासाठी ‘सेनापती, सुभेदार व बाजी’ अशी नावे देण्यात आली आहेत.
लोकांनी दिलेली नावे..
• एसटीआर-टी १ : सेनापती
• एसटीआर-टी २ : सुभेदार
• एसटीआर-टी ३ : बाजी
एसटीआर-टी १ : ‘सेनापती’ का ?
सह्याद्रीच्या खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार लढले. त्यामुळे या खोऱ्यात नांदणाऱ्या वाघांची नावे स्वराज्यातील सरदारांना असलेल्या पदव्यांप्रमाणे देण्यात आली आहेत. एसटीआर-टी १ हा सर्वप्रथम व्याघ्र प्रकल्पात आल्याने लढाईत ज्याप्रमाणे ‘सेनापती’ सर्वप्रथम येतो, त्यावरून या वाघाला हे नाव देण्यात आले आहे.
‘आपल्या सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पातील वाघांना स्थानिक लोकांनीच ही लोकप्रिय नावे दिली आहेत. यामुळे वाघांबाबत जनजागृती वाढते, त्यांच्याशी आत्मीय नाते जुळते आणि संवर्धनाच्या कामाला नवी गती मिळते. ‘सेनापती, सुभेदार आणि बाजी’ ही नावे सह्याद्रीच्या समृद्ध इतिहासाची, स्वराज्याची व परंपरेची आठवण करून देतात. - तुषार चव्हाण, क्षेत्रसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर.
वाघांना लोकांनीच नावे देणे हा सामाजिक सहभागाचा एक अनोखा प्रकार आहे. त्यामुळे वाघांबाबत आपुलकी वाढते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील हा संगम भावी काळात वन्यप्राणी संवर्धन, पर्यटन आणि जनजागृती या सर्वच दृष्टींनी महत्त्वाचा ठरणार आहे. - रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक