Satara Crime News: सुखेड खून प्रकरण: पोलिसाने खून करून ‘असा’ सोडला पुरावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 15:50 IST2026-02-13T15:49:19+5:302026-02-13T15:50:32+5:30
नवी मुंबई पोलिस दलातील हवालदार बंडू भिसे याने आपल्या चार साथीदारांसह तरुणाचा खून करून पुरावे नष्ट करण्याचा थरारक कट रचल्याचे समोर आले

Artificial intelligence
सातारा : गुन्हे उघडकीस आणण्यात आयुष्य गेलेल्या पोलिसालाच अखेर कायद्याने बेड्या ठोकल्या. सुखेड खून प्रकरणात नवी मुंबईपोलिस दलातील हवालदार बंडू भिसे याने आपल्या चार साथीदारांसह तरुणाचा खून करून पुरावे नष्ट करण्याचा थरारक कट रचल्याचे समोर आले आहे. अखेर गुन्ह्याची कबुली देताच त्याला अटक करण्यात आली.
वाद मिटवण्याच्या बहाण्याने भिसे याने सोमनाथ बोबडे याला बोलावून घेतले. गप्पांच्या ओघात त्याला कारमध्ये बसवले आणि कारमध्येच त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह कारमध्ये ठेवून तो झोपला असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. नवी मुंबई ते खंडाळा-सुखेड असा तब्बल १९१ किलोमीटरचा प्रवास मृतदेहासह करण्यात आला.
गावात कोणी ओळखू नये म्हणून आरोपी रात्री उशिरा सुखेड येथे पोहोचले. तेथे पेट्रोल ओतून मृतदेह जाळण्यात आला. ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप करण्यात आला आणि नंतर मृतदेह विहिरीत फेकण्यात आला. सर्व पुरावे नष्ट केल्याचा विश्वास बाळगत भिसे मुंबईला परतला. एवढेच नव्हे तर तो नेहमीप्रमाणे ड्यूटीवरही रुजू झाला. जणू काही घडलेच नाही, असा आव आणला. परंतु, एका छोट्याशा पुराव्याने संपूर्ण कट उघडकीस आणला. मृत सोमनाथच्या हातावर गोंदलेले टॅटू जळाले नव्हते. त्यावरून सोमनाथची ओळख पटली. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली.
हे पुरावे सापडले
सुखेड परिसरातील दोन दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात एक कार दोन वेळा टोल नाक्यावरून गेल्याचे स्पष्ट झाले. तीच कार सुखेड परिसरातही आढळली. सोमनाथच्या मोबाइलचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासल्यावर संशयाची सुई थेट हवालदार बंडू भिसेकडे वळली. सातारा पोलिसांचे पथक नवी मुंबईत भिसेकडे पोहोचले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कसलीही भीती नव्हती. मात्र, ठोस पुरावे समोर ठेवताच तो गडबडला. अखेर गुन्ह्याची कबुली देताच त्याला अटक करण्यात आली.