सातारा जिल्ह्यात पाऊस ओसरला.. पूर कायम; पंचनामे सुरू!, कोयना धरणात किती पाणीसाठा.. वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:34 IST2025-05-28T13:33:37+5:302025-05-28T13:34:12+5:30
माणमधील पूल पाण्याखाली; अनेक गावे संपर्काबाहेर

सातारा जिल्ह्यात पाऊस ओसरला.. पूर कायम; पंचनामे सुरू!, कोयना धरणात किती पाणीसाठा.. वाचा सविस्तर
सातारा : पावसामुळे माण तालुक्यातील मार्डी-दहिवडी रस्ता रविवारपासून वाहतुकीस बंद असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. आठवडाभरातील पावसाने दुष्काळी माण व खटाव तालुक्यातील ओढे, नाले तलाव भरून वाहू लागले आहेत. राणंद तलावातील सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने येथील पूल पाण्याखाली गेला आहे. रविवारपासून वाहतूक बंद असल्याने दहिवडीला जाण्याचा मार्ग बंद झाला असून, पाणी कधी ओसरणार याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
वळई-विरळी, जांभुळणी, पानवण, गंगोतीसह वरकुटे-मलवडी परिसरात चार ते पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने माण तालुक्यात दाणादाण उडाली आहे. पुळकोटी गावच्या पुलावरून साधारणत: अडीच-तीन फूट पाणी वाहत असल्याने नागरिकांचा म्हसवड शहराशी संपर्क तुटला आहे. तर, काही ठिकाणी संततधार पावसाने घरांची पडझड झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
कोयना धरणात १९ टीएमसी पाणीसाठा..
गेल्या आठ-दहा दिवसांपासून धुवाधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारी थोडा कमी झाला. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात १६.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मे महिन्यातील सलग आठ दिवसांच्या पावसामुळे धरणातही पाण्याची आवक झाली आहे. कोयना धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा १९.१९ टीएमसी आहे, तर गतवर्षीच्या २७ मे रोजी १६.३४ इतका साठा होता. गतवर्षी आटलेले आंधळी धरण मे महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले आहे.
बोरणे घाटात दरड कोसळली; वाहतूक पूर्ववत..
सातारा-ठोसेघर मार्गावर असलेल्या बोरणे घाटात अतिवृष्टीमुळे सोमवारी रात्री दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने मंगळवारी सकाळी तातडीने दरड हटविण्याचे काम हाती घेतले. दुपारी हे काम पूर्णत्वास आल्यानंतर ठोसेघरकडे जाणारी वाहतूक पूर्ववत झाली.