सातारा : रमजानच्या पवित्र महिन्यात असंख्य मुस्लीम बांधवांनी रोजे (उपवास) धरले आहेत. दिवसभर धरलेला कडक उपवास सायंकाळी सूर्यास्तानंतर सोडला जातो. यानिमित्त साताऱ्यात ठिकठिकाणी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले आहेत. यामध्ये खासकरून दिल्लीचा मेवा अन् लखनवी कवाबला विशेष मागणी होत आहे.रमजान महिन्यात दिवसभर कडक उपवास धरला जातो. सर्वसाधारणपणे चौदा ते पंधरा तास कडक उपवास धरलेले सूर्यास्तानंतर एकत्र येऊन हा उपवास सोडतात. उपवास सोडण्यासाठी दररोजच्या पदार्थांबरोबरच नवनवीन प्रकारच्या खाद्यपदार्थांना विशेष मागणी असते. शहरातील शनिवार पेठ, शाही मशीद, मर्कस मशीद, सदर बजार, नाका परिसरात स्टॉल उभारले आहेत. याठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. रोजा सोडण्यासाठी एकमेकांना बोलाविले जाते. त्यामुळे प्रत्येकजण वेगळ्या प्रकारचा पदार्थ घेऊन जाण्यावर भर देतात. (प्रतिनिधी)खवय्येगिरांना संधी--रमजानच्या निमित्ताने साताऱ्यात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, सुकामेवा उपलब्ध होत आहे. या पदार्थांना केवळ उपवास धरणाऱ्यांबरोबरच सर्वच खवय्येगिरांमधून मागणी होत आहे. रमजानमध्ये विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांना खास मागणी असल्याने दिल्लीचा मेवा, लखनऊमधील विविध खाद्यपदार्थ ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहेत.- मुख्तार पालकर, विक्रेते
दिल्ली, लखनऊची मिठाई साताऱ्यात!
By admin | Updated: June 10, 2016 00:15 IST