Satara ZP Election 2026: स्वबळावर लढण्याचा नारा देणा-या भाजपने यु-टर्न घेतला
By नितीन काळेल | Updated: January 22, 2026 19:36 IST2026-01-22T19:35:06+5:302026-01-22T19:36:06+5:30
कोरेगावमध्ये भाजप-शिंदेसेनेबरोबर; फलटणध्ये राष्ट्रवादीसोबत युती

Satara ZP Election 2026: स्वबळावर लढण्याचा नारा देणा-या भाजपने यु-टर्न घेतला
नितीन काळेल
सातारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. जिल्ह्यात स्वबळावर लढण्याचा नारा देणा-या भाजपने ऐनवेळी यु-टर्न घेतला. कोरेगावमध्ये शिंदेसेनेला तर फलटणमध्ये राष्ट्रवादीला काही जागा सोडल्याचेही समोर आले. तर जिल्हयात दोन्ही राष्ट्रवादीही अनेक ठिकाणी एकत्र असून काॅंग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनाही मैदानात उतरल्याचे दिसून आले आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि ११ तालुक्यांतील पंचायत समितीच्या १३० गणांसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी बुधवार हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. यामुळे अनेक राजकीय घडामोडी घडल्या. तसेच पक्षांच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज सादर केले. या निवडणुकीत पूर्वीपासूनच भाजपचा स्वतंत्र बाणा दिसून आला. पण, शेवटच्या दिवशी काही ठिकाणी भाजपने यू टर्न घेतल्याचे समोर आले.
कोरेगाव, फलटणमध्ये तह...
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपने शिंदेसेनेसाठी काही गटात आणि गणांत उमेदवार उभे केले नाहीत. त्यामुळे दोघांची युती झाल्याचे सांगण्यात येऊ लागले आहे. पण, या मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत. फलटण तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आली. दोघांनी मिळून जागा वाटून घेतल्या आहेत. पण, येथे शिंदेसेना स्वतंत्रपणे लढत आहे.
सहा तालुक्यात भाजप स्वबळावर...
माण तालुक्यात भाजप स्वतंत्र लढत आहे. याठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचे समोर आलेले आहे. खटाव तालुक्यातही भाजप स्वतंत्रपणे रिंगणात आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असून काॅंग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र उमेदवार उभे केलेत. खंडाळ्यात भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्र आहेत. पाटणला शिंदेसेना आणि भाजप हे दोघेही स्वतंत्र लढत आहेत. कराडमध्ये भाजप स्वतंत्र असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. सातारा तालुक्यात भाजप स्वतंत्रपणे लढत आहे. जावळी तालुक्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षात वाटाघाटी झाल्याची माहिती समोर येत आहे.
काही जागांवर सोयीचे राजकारण....
बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. तरीही कोणता पक्ष किती ठिकाणी रिंगणात आहे, हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. तसेच अनेक ठिकाणी सोयीचे राजकारणही झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संपूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी अजून काही दिवस जाणार आहेत. तरीही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत २७ जानेवारी आहे. त्यानंतरच कोणाची युती झाली, कोणी कोणासाठी किती जागा सोडल्या हे स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत फक्त चर्चाच सुरू राहतील.