सातारा जिल्ह्यात हायस्पीडचे ५२ बळी!, एका महिन्यातील विदारक स्थिती
By दत्ता यादव | Updated: June 6, 2025 15:10 IST2025-06-06T15:10:38+5:302025-06-06T15:10:57+5:30
वेगावर नियंत्रण नसल्याने कुटुंबांची वाताहत

सातारा जिल्ह्यात हायस्पीडचे ५२ बळी!, एका महिन्यातील विदारक स्थिती
दत्ता यादव
सातारा : नैसर्गिक मृत्यूपेक्षाअपघातीमृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून, सातारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात तब्बल ५२ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या अपघाताचे एकमेव कारण हायस्पीड हे आहे. आपल्या कर्त्या पुरुषाच्या मृत्यूमुळे अनेक कुटुंबांची अक्षरश: वाताहत झाली आहे.
आपल्या घरातील कर्ता पुरुष सकाळी घरातून कामावर जातो. मात्र, संध्याकाळी तो सुरक्षित परत येईल की नाही, याचा सध्या कोणालाही भरवसा नाही. रस्ते चकाचक झाले. परिणामी वेग वाढला. मात्र, गाडीवर भरवसा ठेवून वाहनचालकांचा अतिवेग नडत आहे. अपघात हा कधीही सांगून होत नाही. पण खबरदारी घ्यावी लागते. वाहनचालक आपल्याच धुंदीत, घाईगडबडीत, अतिआत्मविश्वास ठेवून वाहने हायस्पीडने चालवत आहेत. यामुळे स्वत:सह दुसऱ्याच्या आयुष्याचीही राखरांगोळी करत आहेत.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रत्येक अपघातावेळी पोलिसांच्या निदर्शनास येते. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना वाहनचालक करत नाहीत. बरेच कारचालक सीटबेल्ट न लावता व दुचाकी चालक हेल्मेट न घालता वाहन चालवतात. अशा वेळी अपघात झाल्यास दुर्दैवाने वाहनचालकांचा जागीच मृत्यू होतोय.
महामार्गावर १४५ च्या अतिवेगाने प्रवास..
महामार्गावर सध्या काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पाणी साचत असल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. तरीसुद्धा अनेक वाहनचालक १४० ते १४५ च्या स्पीडने वाहने चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अशा वेळी खड्ड्यात गाडी आदळून चालकाचे नियंत्रण सुटत आहे.
ही आहेत अपघाताची कारणे..
अतिवेग हे अपघाताचे प्रमुख कारण ठरत आहे. तसेच घाईगडबड आणि कोणत्याही परिस्थितीत गाडीवर नियंत्रण मिळवू शकतो. हा अनेक चालकांचा अतिआत्मविश्वास. याशिवाय धोकादायक वळण, खड्डे, गाडीचा टायर फुटण्याची समस्या. मधधुंद अवस्थेत वाहन चालविणे, अशी काही अपघात होण्याची प्रमुख कारणे आहेत.
अपघात कुठे झाले..
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग व आंतरजिल्ह्यातील रस्त्यांवर एप्रिल महिन्यांत ९८ अपघात झाले. यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर १७ अपघात झाले असून, यात ५ जण ठार झाले. राज्यमार्गावर २१ अपघात झाले असून, यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला, तर आंतरजिल्हा मार्गावर ६० अपघात झाले. यात सर्वाधिक ३५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे एप्रिल महिन्यात एकूण ५२ जणांचा हायस्पीडने बळी घेतला आहे.
वेगावर नियंत्रण ठेवावे. आपले बरे-वाईट झाले, तर आपल्या पश्चात कुटुंबाचे काय होईल, याचा वाहनचालकांनी विचार करावा. वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालविल्यास आपला प्रवास सुरक्षित होईल. - विकास धस, पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, सातारा