सातारा : अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०१८-१९ पासून महाडीबीटी या ऑनलाइईन प्रणालीवर शिष्यवत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी व इतर योजनांचे अर्ज भरण्यात येतात. सर्व महाविद्यालयांनी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात आपले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अर्ज नोंदणी करण्याचे प्रमाण अत्यल्प असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.
कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, इतर योजनांपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी घ्यावी. तसेच महाविद्यालय स्तरावर अर्ज भरतेवेळी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासंदर्भात कमिटी स्थापन करण्यात यावी व विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात यावे. कमिटीद्वारे विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविताना काही प्रश्न उद्भवल्यास त्याबाबत या कार्यालयास अवगत करावे व नमूद केलेल्या प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त प्रमाणात शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी व इतर योजनांच्या लाभाकरिता अर्जांची नोंदणी करून घ्यावी, असेही उबाळे यांनी कळविले आहे.