सातारा जिल्ह्याच्या मनात घर करून गेलेला ‘दादा’ माणूस!, जिहे-कठापूर योजनेत योगदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 18:30 IST2026-01-29T18:30:01+5:302026-01-29T18:30:26+5:30
Ajit Pawar Passed Away: वर्धनगड बोगद्यात मशिनरी आणून पाळला शब्द

सातारा जिल्ह्याच्या मनात घर करून गेलेला ‘दादा’ माणूस!, जिहे-कठापूर योजनेत योगदान
सातारा : राज्याचे ‘दादा’ म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार. स्वपक्षातीलच नाही, तर विरोधकांच्या योग्य कामांना न्याय देणारे, पण आता त्यांच्या निधनाने स्वपक्षाबरोबरच विरोधकांनीही त्यांच्याबराेबरच्या आठवणी जागवल्या. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ते आतापर्यंतच्या राजकीय घडामोडीही मांडल्या. यामध्ये जिल्ह्यातील दुष्काळी भागाची टेंभू आणि जिहे-कठापूर योजनेविषयीही भरभरून सांगितले. त्यावेळचे विरोधातील खटावचे आमदार डाॅ.दिलीप येळगावकर यांचे विधानसभेतील उपोषण दादांनी सोडवून जिहे-कठापूर योजनेचा शब्द पाळला होता, तसेच वर्धनगड घाटातील बोगद्यात मशिनरी आणून कामाची सुरुवातही केली होती. त्यामुळे दादांचे जिल्ह्यासाठीचे योगदान स्पष्ट होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुळगाव हे सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील नांदवळ. नंतर ते बारामतीला गेले, पण शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्नेह हा सातारा जिल्ह्यावर कायम राहिला. अजित पवार नेहमीच सातारा दाैऱ्यावर येत. अजित पवार सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. त्यावेळी त्यांच्या कामाचा धडाका सर्वांनीच पाहिला, तसेच हाच धडाका शेवटपर्यंत कायम ठेवला. त्यांच्यामुळेच जिल्ह्यातील अनेक कामे मार्गी लागली. सहकाराला बळकटी मिळाली, तर राजकारणात नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांना ताकदही दिली.
जिहे कटापूरसाठी डाॅ.येळगावकरांचे उपोषण सोडले...
खटाव विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात होता. त्यावेळी २००४ च्या निवडणुकीत डाॅ.दिलीप येळगावकर हे भाजपमधून आमदार झाले, तर राज्यात आघाडी सरकार होते. अजित पवार मंत्रिमंडळात होते. २००७ च्या सुमारास उरमोडी आणि जिहे-कटापूर योजनेची कामे त्वरित सुरू करावीत, या मागणीसाठी विधानसभेच्या पायरीवर डाॅ.येळगावकर यांनी उपोषण सुरू केले होते. त्यावेळी अजित पवार यांनी डाॅ.दिलीप येळगावकर यांना उपोषण सोडायला लावले, तसेच आठ दिवसांत पुन्हा मशिनरी वर्धनगड बोगद्यात आणली. त्यावेळी स्वत: अजित पवार उपस्थित होते. त्यांनी डाॅ.येळगावकर यांना मान दिला, तसेच जिहे-कठापूर योजनेचा दिलेला शब्दही पाळला.
टेंभू योजनेची पहिली प्रशासकीय मान्यता...
माण आणि खटाव तालुक्यासाठी टेंभू योजना महत्त्वाची होती. यासाठी दोन्ही तालुक्यांतील नेत्यांनी प्रयत्न केले. या टेंभू योजनेला पहिली प्रशासकीय मान्यता अजित पवार यांच्यामुळेच मिळाली होती, असे सांगण्यात येत आहे.