US-Israel-Iran war: उमरा यात्रेसाठी सौदीत गेलेले हजारो भाविक पडले अडकून, कुटुंबीयांची चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 12:30 IST2026-03-03T12:28:42+5:302026-03-03T12:30:19+5:30
रमजान महिन्यात उमरा यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने दरवर्षी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक सौदी अरेबियात जातात

संग्रहित छाया
मिरज (जि. सांगली) : इराण-अमेरिका युद्धामुळे आखाती देशांतील विमानसेवा बंद केल्याने रमजान महिन्यात पवित्र उमरा यात्रेसाठी सौदी अरेबिया येथे गेलेले सांगली जिल्ह्यातील शेकडो भाविक अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
रमजान महिन्यात उमरा यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने दरवर्षी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक सौदी अरेबियात जातात. हज यात्रेसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने अनेक मुस्लीम बांधव वर्षभर उमरा यात्रा करतात; मात्र रमजानमध्ये उमरा यात्रेला अधिक पसंती दिली जाते. यंदाही दि. १५ ते १७ फेब्रुवारीला सांगली, मिरज परिसरातील शेकडो भाविक खासगी ट्रॅव्हल एजंटांमार्फत एका महिन्याच्या यात्रेसाठी रवाना झाले आहेत.
आता इराण-अमेरिका युद्ध सुरू होऊन सौदी अरेबियातील अमेरिकन तळावर हल्ला झाल्याने विमानसेवा थांबवण्यात आली आहे. यामुळे परतीच्या उड्डाणांबाबत अनिश्चितता आहे. मिरजेतील ट्रॅव्हल एजंट अन्वर शेख यांनी सांगितले की, काही भाविकांना विमानसेवा बंद झाल्यामुळे मुंबई विमानतळावरूनच परतावे लागले, जे आधीच सौदीत पोहोचले आहेत, त्यांच्या परतीच्या तारखा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यातील हजारो कामगार दुबई, ओमान, बहरीन, कुवेत आणि कतार या आखाती देशांत नोकरी-व्यवसायांसाठी वास्तव्यास आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे या सर्व देशांतील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंता वाढली आहे.
मिरजेतील खाजा मुजावर हे गेली काही वर्षे सौदी अरेबियातील दम्माम येथे खासगी नोकरी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी रियाध येथे अमेरिकन तळावर झालेल्या हल्ल्यानंतर राजधानी परिसरात सुरक्षा कडक करण्यात आली आहे. मात्र, रियाध वगळता इतर शहरांत कामकाज सुरळीत असल्याची माहिती त्यांनी दिली. रियाध येथे फार्मसीमध्ये कार्यरत असलेले मिरजेतील तरुण मोहम्मद इलियास मुजावर यांनी सांगितले की, हल्ला झालेल्या परिसरात बंदोबस्त असून, नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पुन्हा हल्ला होण्याच्या शक्यतेमुळे शहरात तणाव आहे.
रियाधमध्ये हल्ल्याच्या वृत्तानंतर मिरजेतून नातेवाइकांकडून सतत फोनवरून चौकशी होत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने केंद्र सरकारकडून अधिकृत माहिती घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवावे व भाविकांच्या कामगारांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक मदत व समन्वय साधण्याची त्यांच्या कुटुंबीयांची मागणी आहे.
दुबईतील पर्यटनस्थळे बंद
युद्धजन्य परिस्थितीमुळे गेल्या दोन दिवसांपासून दुबईतील पाम जुमेरा, बुर्ज अलअरब, बुर्ज खलिफा यांसह इतर पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, अन्य कामकाज अद्याप सुरळीत असल्याचे दुबईत इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काम करणारे मिरजेतील महेबूब बादशहा शेख यांनी सांगितले.