कोयनेच्या जंगलात बाजीची डरकाळी, ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; हालचालींवर वनविभागाचे बारीक लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 14:45 IST2026-01-27T14:43:35+5:302026-01-27T14:45:08+5:30
विकास शहा शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून ...

कोयनेच्या जंगलात बाजीची डरकाळी, ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; हालचालींवर वनविभागाचे बारीक लक्ष
विकास शहा
शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून सह्याद्रीच्या दुर्गम भागात आपला वावर निर्माण करणाऱ्या बाजी या नर वाघाने आता कोयना परिसरात आपले साम्राज्य प्रस्थापित केल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकत्याच झालेल्या व्याघ्र गणनेदरम्यान बाजीचे दर्शन कॅमेरा ट्रॅपमध्ये झाले असून, त्याच्या डरकाळीने संपूर्ण सह्याद्रीचा परिसर दुमदुमून गेला आहे.
कोयना भागात बाजीची दहशत
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सध्या तीन नर वाघांचा संचार आहे. यातील सेनापती आणि सुभेदार यांनी चांदोली परिसरात आपली हद्द निश्चित केली आहे, तर बाजीने कोयना भागातील भैरवगड ते पाली, मालदेव या पट्ट्यात आपला दरारा निर्माण केला आहे. विशेष म्हणजे अखिल भारतीय व्याघ्र गणना फेज १ वेळेस आलेल्या काही स्वयंसेवक यांना कोयना भागात पाली व जुगंटी परिसरात मोठ्या मोठ्याने बाजी वाघाच्या डरकाळ्या ऐकण्यास मिळाल्या.
बाजीची वैशिष्ट्ये :
वय : साधारण ३ ते ३.५ वर्षे (पूर्ण वाढ झालेला नर).
पंज्याचा ठसा : १६ सेमी x १६ सेमी इतका मोठा आणि रुंद.
सध्याची स्थिती : बाजी या परिसरात शिकार करून आपली हद्द टिकवून आहे.
देशभरातील स्वयंसेवकांच्या उपस्थितीत व्याघ्र गणना
नुकतेच ''राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण'' आणि ''भारतीय वन्यजीव संस्था'' यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्रीत ''फेज १'' व्याघ्र गणनेचे आयोजन करण्यात आले होते. १२ ते १७ जानेवारी दरम्यान पार पडलेल्या या सर्वेक्षणात केरळ, कर्नाटक, ओडिसा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार यांसारख्या राज्यांतून तब्बल ७५ स्वयंसेवक सहभागी झाले होते. या मोहिमेत कॅमेरा ट्रॅपमध्ये बाजीचे स्पष्ट फोटो आणि व्हिडीओ कैद झाले आहेत.
पर्यटनाला मिळणार चालना
वाघांच्या वाढत्या वावरामुळे सह्याद्रीतील वन पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. याचा थेट फायदा स्थानिक युवकांना होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. सह्याद्रीचा हा बाजीराव आता आपल्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप असून, वनविभागाकडून त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
सह्याद्रीत आता वंशवृद्धीचे वेध
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, नुकतेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून दोन वाघिणींना सह्याद्रीत सोडण्यात आले आहे. आता बाजी, सेनापती आणि सुभेदार या नरांच्या जोडीला मादी वाघिणी उपलब्ध झाल्याने भविष्यात सह्याद्रीत वाघांची संख्या वाढण्याची (वंशवृद्धी) मोठी शक्यता निर्माण झाली आहे.