मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास देणे बंद करा, मंत्री उदय सामंत यांनी दिल्या कानपिचक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 16:05 IST2026-02-05T16:04:51+5:302026-02-05T16:05:24+5:30
कोट्यवधींचा खोटा विकास निधी प्रथमच पाहतोय

मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास देणे बंद करा, मंत्री उदय सामंत यांनी दिल्या कानपिचक्या
मिरज: आमदार झाल्यानंतर मनासारखे राजकारण करून कार्यकर्त्यांना फाट्यावर मारणे हे काही विकासाचे लक्षण नाही. मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे प्रकार बंद करा, अशा कानपिचक्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रचारसभेत दिल्या.
बेडग व मालगाव येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात मंत्री सामंत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, मित्रपक्षाचे उमेदवारही तुम्हीच ठरवणार का? विकासाचे राजकारण करा, दबावाचे नाही. महायुतीतील मित्रपक्षात राज्यात व जिल्ह्यात जमीन–अस्मानाचा फरक आहे. मालगावात शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या मुलाला पोलिसांकडून त्रास दिला जातो. मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास देणे बंद करा. पोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडू नये, असे आवाहन सामंत यांनी केले.
वाचा: सुहास बाबर यांची पहिली टर्म शेवटची ठरू नये, गिरीश महाजन यांनी दिला इशारा
रस्त्यांवर खड्डे व कागदावर विकास, हा बेडग, मालगावचा विकास पॅटर्न आहे. इथे विकास नाही, फक्त खर्चाची कागदोपत्री आकडेवारी असल्याची टीका त्यांनी केली. मोहन वनखंडे यांना आम्ही मोठं करून चूक केली, असे विधान आमदार खाडे यांनी केल्याने शिंदेसेनेचे मोहन वनखंडे यांनीही, मीच तुम्हाला मिरजेत पाऊल ठेवायला दिलं, त्यामुळे कोण कोणाला मोठं केलं हे जनतेला चांगलंच माहीत आहे, असे सुनावले.
यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, शिंदेसेना जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, महापालिका क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे, पैलवान चंद्रहार पाटील, सुनीता मोरे, विकास सूर्यवंशी, नगरसेवक सागर वनखंडे, युवराज बावडेकर, अमरसिंह पाटील व पदाधिकारी उपस्थित होते. मिरज पूर्व भागात निवडणूक प्रचारात भाजप व मित्रपक्षात विकासापेक्षा वाद, आरोपांचा धुरळा सुरू असल्याचे चित्र आहे.