मराठा आरक्षणाचा अधिकार शरद पवार यांनी घालविला, विनोद तावडे यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 18:15 IST2024-08-29T18:14:33+5:302024-08-29T18:15:28+5:30

शिराळा येथे भाजपचा संवाद मेळावा

Sharad Pawar revoked the right of Maratha reservation Criticism of BJP leader Vinod Tawde | मराठा आरक्षणाचा अधिकार शरद पवार यांनी घालविला, विनोद तावडे यांची टीका 

मराठा आरक्षणाचा अधिकार शरद पवार यांनी घालविला, विनोद तावडे यांची टीका 

शिराळा : मराठा आरक्षणासाठी भाजपने प्रामाणिक प्रयत्न केले. काँग्रेस-राष्ट्रवादीने वर्षानुवर्ष सत्ता भोगली. परंतु, शरद पवार यांनी कधीही आरक्षणाबाबत शब्द काढला नाही. मराठा आरक्षणाचा अधिकार शरद पवार यांनी मारला, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी केले. शिराळा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा आमदार कितीही नौटंकी करू देत, ही जागा भाजपलाच मिळेल आणि भाजपच जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.

शिराळा येथे बुधवारी झालेल्या भाजप पदाधिकारी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, भाजपा नेते सत्यजित देशमुख, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, भाजपचे नेते सम्राट महाडिक, सी. बी. पाटील, संपतराव देशमुख, केदार नलावडे, जगन्नाथ माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सत्यजित देशमुख म्हणाले, येथील आमदारांनी कारखान्याच्या सभेमध्ये केंद्र सरकारचे धोरण साखर कारखानदारीला पोषक नाही म्हणून टीका केली. पुन्हा केंद्र सरकारकडून एनसीडीसीच्या माध्यमातून कारखान्याला कर्ज घेण्यासाठी येतात. हा दुटप्पीपणा त्यांनी सोडावा. सम्राट महाडिक म्हणाले, शिराळ्यातील केंद्रप्रमुख मजबूत आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ भाजपला मिळावा. विद्यमान आमदारांनी दबावाचा वापर करून लोकांना त्रास देण्याचे काम केले आहे. राज्य सरकारकडून भरपूर निधी मिळवला आणि भाजपाच्याविरोधातच कटकारस्थान रचले आहे.

यावेळी हणमंत पाटील, के. डी. पाटील, डॉ. सचिन पाटील, रणजीतसिंह नाईक, अशोक पाटील, जयकर कदम, सम्राट शिंदे, तानाजी कुंभार, भीमराव पाटील, सर्जेराव पाटील, शेखर भोसले, विद्याताई पाटील आदी उपस्थित होते.

शिराळ्यात कुणी कितीही नौटंकी करू दे..

शिराळा मतदारसंघाची सर्व पार्श्वभूमी मी जाणून घेतली आहे. येथील आमदारांचे सर्व उद्योग मला माहिती आहेत. कुणी कितीही नौटंकी करू दे, त्याचा काही परिणाम होणार नाही. विधानसभेला येथे कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही. मराठा आरक्षण हे निव्वळ शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यामुळे सर्वोच्च न्यायालयात फेटाळले गेले. याउलट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजपने मराठा आरक्षण दिले. उच्च न्यायालयात ते टिकवूनदेखील दाखवले, असे तावडे यांनी सांगितले.

शिवाजीराव देशमुख यांची आठवण

शिवाजीराव देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना भिवंडीत दंगल झाली. या दंगलीवेळी त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन कायदा-सुव्यवस्था हाताळली होती. त्यांच्या कामाचे कौतुक माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले होते, अशी आठवण तावडे यांनी सांगितली.

Web Title: Sharad Pawar revoked the right of Maratha reservation Criticism of BJP leader Vinod Tawde