Sangli: जतला डिसेंबरमध्ये सुधारित म्हैसाळ योजेनचे पाणी - राधाकृष्ण विखे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 17:53 IST2026-03-03T17:53:18+5:302026-03-03T17:53:57+5:30
बेळंकीत म्हैसाळ विस्तारित योजना कामातील बोगदा ब्रेक थ्रू समारंभ

Sangli: जतला डिसेंबरमध्ये सुधारित म्हैसाळ योजेनचे पाणी - राधाकृष्ण विखे पाटील
बेळंकी : जत पूर्व भागातील गावांना म्हैसाळ विस्तारित योजनेचे पाणी डिसेंबर २०२६ पर्यंत देण्यात येणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर कामे पूर्ण करावी, असे आदेश जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहेत.
रविवारी बेळंकी (ता. मिरज) येथे म्हैसाळ विस्तारित सिंचन योजनेच्या कामातील बोगदा ब्रेक थ्रू समारंभाचा आयोजन करण्यात आला होता. या समारंभाला मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित होते. त्यांनी दुपारी साडेबारा वाजता बटन दाबून बोगद्यात ब्लास्ट केले.
यावेळी खासदार विशाल पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, आकाराम मासाळ, ब्रह्मानंद पडळकर, सुमनताई खाडे, स्वाती खाडे, सलगरेच्या सरपंच जयश्री पाटील, तानाजी पाटील, तसेच सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
विखे-पाटील म्हणाले की, म्हैसाळ योजना वसंतदादा पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सुरू झाली. त्यांच्या पुण्यतिथीला या विस्तारित कामाच्या बोगद्याचे उद्घाटन करण्याची संधी मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. म्हैसाळ सिंचन योजनेमुळे दुष्काळग्रस्त भागातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचणार असून शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होणार आहे. प्रकल्पाच्या दोन लाइनचे काम पूर्ण झाले आहे आणि तिसऱ्या लाईनसाठी सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत.
कालवे स्वच्छ ठेवणे आणि त्यांच्या पाणी वाहून नेण्याची क्षमता पूर्णपणे वापरली जाईल याची काळजी घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. म्हैसाळ प्रकल्प २७० दिवसांत ५ टीएमसी पाणी वाहणार असून त्याची क्युसेक क्षमता कमी आहे. जल आयोगाच्या मान्यतेचा प्रस्ताव परिषदेने संसर्ग केला तर १५० दिवसांत ५ टीएमसी पाणी वाहण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, गेल्या ३५ वर्षांपासून जतची जनता म्हैसाळ पाण्याची मागणी करत आहे आणि आता ही मागणी पूर्ण होत आहे. परंतु, संपूर्ण जत तालुक्याला दुष्काळमुक्त करायचे असेल तर तिसऱ्या पाइपलाइनची आवश्यकता आहे आणि सरकारने ती पूर्ण करावी.
खासदार विशाल पाटील म्हणाले, सुरुवातीला जतला पाणी पोहचत नव्हते; परंतु आता जत भागाला पाणी मिळण्याच्या मार्गावर आहे. सध्याच्या सरकारने जल आयोगाची परवानगी घेऊन म्हैसाळ आवर्तनाच्या दीडशे दिवसांत पाच टीएमसी पाणी उचलण्याची परवानगी घेतली तर पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी जत भागाला देता येईल.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक ह. तु. धुमाळ यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी अभियंता रो. पा. कोरे यांनी आभार मानले.
५१ किलोमीटर काम पूर्ण
म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन योजनेचे सिंचन क्षेत्र २६ हजार ५०० हेक्टर असून पाणी वापर ५ अ.घ.फु. आहे. या योजनेच्या लाभ क्षेत्रात जत तालुक्यातील पूर्णतः वंचित ४८ गावं आणि मूळ योजनेतून अंशतः वंचित १७ अशी एकूण ६५ गावं आहेत. या योजनेच्या १०२८.६८ कोटी निविदा कामातील ५७ किलोमीटर लांबी पैकी ५१ किलोमीटर म्हणजेच ९१ टक्के काम पूर्ण झाले आहे. तीन पंपगृहांपैकी एका पंपगृहाचे काम पूर्ण आहे आणि उर्वरित दोन पंपगृहांचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे.