सांगली शहराला पुराचा धोका, नागरिकांमध्ये धास्ती; स्थलांतराची तयारी सुरू, किती फुटाला कोठे येतं पाणी.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 18:02 IST2025-08-20T18:02:13+5:302025-08-20T18:02:50+5:30
महापालिका यंत्रणा सतर्क

छाया-नंदकिशोर वाघमारे
सांगली : पावसाचा जोर वाढल्याने कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी फुटाफुटाने वाढू लागली आहे. शहरातील आयर्विन पुलाजवळ सायंकाळी पाणी पातळी २५ फुटांपर्यंत गेल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. शहराला पुराचा धोका निर्माण झाल्याने महापालिकेने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांच्या स्थलांतराची तयारीही पालिकेने हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यात २० ते २५ कुटुंबीयांना हलविण्याची तयारी चालविली आहे.
दरम्यान, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी नदीकाठच्या नागरिकांशी संवाद साधत धीर दिला. गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाची संततधार सुरू आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्गही वाढविण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
आयर्विन पुलाजवळ काल रात्री १९ फुटांवर असलेली पातळी दुपारपर्यंत २१ फूट, तर सायंकाळपर्यंत २५ फुटांपर्यंत गेली होती. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने पाणी पातळी ४० फुटांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविल्याने महापालिकेची यंत्रणा अलर्ट मोडवर आली. अतिरिक्त आयुक्त रोकडे यांनी तातडीने आपत्ती व्यवस्थापन प्रमुख नकुल जकाते, अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांची बैठक घेऊन सूचना केल्या.
दोन ठिकाणी निवारा केंद्रे
कृष्णा नदीची पातळी ४० फुटांपर्यंत गेल्यास शहरातील सरकारी घाट, सूर्यवंशी प्लाट, इनामदार प्लाट, कर्नाळ रोड, दत्तनगर, काकानगर या परिसरातील नागरिकांना पुराचा फटका बसणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना स्थलांतर करण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे. त्यासाठी विश्रामबाग आणि गणेशनगर येथील रोटरी हालमध्ये निवारा केंद्र सुरू केले जाणार आहे.
एनडीआरएफकडून पाहणी
दरम्यान, एनडीआरएफ पथक आणि महापालिका अग्निशमन दलाने पूरभागाची पाहणी केली आहे. संभाव्य पूरबाधित भागातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना करण्यात येत आहे. पालिकेच्या अग्निशमन यंत्रणेकडून रेस्क्यूसाठी तयारी करण्यात आली आहे.
चोवीस तास वॉररूम
संभाव्य पूरस्थिती पाहता, महापालिकेने २४ तास वॉररूम कार्यरत केल्याचे आयुक्त गांधी यांनी सांगितले. प्रशासनाने संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि आवश्यक त्या सोईसुविधांसह प्रशासन सतर्क आहे. पूरबाधित नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. त्यांनी मदतीसाठी वॉररूमशी संपर्क साधावा. अधिकाऱ्यांचे मोबाइल नंबरही प्रशासनाने जाहीर केले आहेत, असेही ते म्हणाले.
किती फुटाला कोठे पाणी
पाणी पातळी (फुटात) - बाधित क्षेत्र
३०- सूर्यवंशी प्लॉट
३१ - इनामदार प्लॉट (शिवनगर)
३२.१ - कर्नाळ रस्ता
३३.५ - शिवमंदिर परिसर, बायपास चौक
३४ - काकानगर समोरील घरे
३५ - दत्तनगर परिसर
३९ - मगरमच्छ कॉलनी १
४० - मगरमच्छ कॉलनी २
४१ - मगरमच्छ कॉलनी ३
४२.५ - मगरमच्छ कॉलनी ४-५
४३ - सिद्धार्थ परिसर, राजीव गांधीनगर
४४.५ - भारतनगर पाटणे प्लॉट, हरिपूर रोड
४५.९ - हरिपूर रोड क्रॉस, मारूती चौक चेंबरमधून सुरुवात
४६.६ - व्यंकटेशनगर, आमराई, रामनगर
४८ - टिळक चौक, मारुती रोड, आनंद थिएटर, अमरधाम, शिवाजी मंडई बापट बालसमोरील रस्ता
४९.६ - पद्मा टॉकीज, वखारभाग
५० - गुजराती हायस्कूल, धोबीघाट, ईदगाह समोरील रस्ता
५५ - गोकुळनगर, संजय गांधी झोपडपट्टी, भीमनगर, जुना बुधगाव रस्ता
५७.६- कॉलेज काॅर्नर
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला असून, कृष्णेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वॉररूमशी संपर्क साधावा. महापालिकेकडून खबरदारी म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. - राहुल रोकडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका