सांगली जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी ५००० कोटींची गरज, आराखडा करण्याच्या जलसंपदामंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:29 IST2025-06-12T13:29:02+5:302025-06-12T13:29:30+5:30
जयंत पाटील भाजप प्रवेशाची माहिती नाही

सांगली जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी ५००० कोटींची गरज, आराखडा करण्याच्या जलसंपदामंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
सांगली : जिल्ह्यातील अपूर्ण टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ आणि वाकुर्डे सिंचन योजनांसाठी पाच हजार कोटी रुपये निधीची गरज आहे. या योजनांच्या अपूर्ण कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल तातडीने देण्याची सूचना दिली आहे. या अहवालानंतर निधी मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न करणार आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
सांगलीतील वारणालीत बुधवारी जलसंपदा विभागाच्या कामाची आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर जलसंपदा मंत्री विखे-पाटील बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, कृष्णा खोरे महामंडळाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे आदी उपस्थित होते.
मंत्री विखे-पाटील म्हणाले, जिल्ह्यातील टेंभू, म्हैसाळ, ताकारी, आरफळ, वारणा आणि मोरणा योजनांची अनेक कामे प्रलंबित आहेत. या योजनांसाठी जवळपास पाच हजार कोटी रुपयांची गरज आहे. त्याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अपूर्ण योजना २०२८ पर्यंत पूर्ण होतील, असा अंदाज असला तरी निधी उपलब्ध करून देऊन त्या २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पुढील वर्षापासून पुराचे ५५ टीएमसी पाणी वळविणार
पूरनियंत्रणासाठी वर्ल्ड बँकेने तीन हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. पुराचे पाणी वळवण्याच्या योजनेच्या कामांची निविदा लवकरच काढली जाणार आहे. पुराचे पाणी एका वर्षात नेण्याचा प्रयत्न आहे. पुढील वर्षापासून ५५ टीएमसी पाणी वळविले जाईल, त्यामुळे पुरापासून मुक्तता होईल, असा विश्वास मंत्री विखे-पाटील यांनी व्यक्त केला.
महापालिकेने प्रदूषण थांबवावे, अन्यथा पाणी कपात
राज्यात नदी प्रदूषणाचा विषय गंभीर आहे. याबाबत महानगरपालिका, नगरपालिकांना पाणी दिले जाते. प्रदूषण टाळण्यासाठी महानगरपालिकेस एचटीपी पंप बसवावे लागतील. ज्या महापालिका कार्यवाही करणार नाहीत, त्यांची पाणी कपात करावी लागेल, असा इशारा मंत्री विखे-पाटील यांनी दिला.
जयंत पाटील भाजप प्रवेशाची माहिती नाही
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षाच्या अडचणीच्या काळातही नेतृत्व केले आहे. नवनवीन लोकांना संधी मिळायला पाहिजे. त्यामुळे राजीनामा देणार असतील. पण त्यांची भाजपमध्ये येण्यासंदर्भात काहीही माहिती नसल्याचे मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.