अडत वसुली केल्यास आंदोलन : संजय कोले

By Admin | Updated: December 25, 2014 00:09 IST2014-12-24T22:33:30+5:302014-12-25T00:09:02+5:30

अडत, हमाली, तोलाई, लेव्ही आदी खर्च शेतकऱ्यांकडून न घेता संबंधित खरेदीदाराकडून वसूल करण्यात यावा, असा पणन संचालकांचा आदेश

Movement: If Sanjay Dutt gets relief, Sanjay Kolle | अडत वसुली केल्यास आंदोलन : संजय कोले

अडत वसुली केल्यास आंदोलन : संजय कोले

सांगली : देशातील बहुतांशी राज्यात अडत वसुली खरेदीदार, व्यापारी यांच्याकडूनच करण्यात येते. परंतु महाराष्ट्र याला अपवाद आहे. राज्यात भविष्यात अडत शेतकऱ्यांकडून वसूल केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा खासदार शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय कोले यांनी पत्रकार बैठकीत दिला.
अडत, हमाली, तोलाई, लेव्ही आदी खर्च शेतकऱ्यांकडून न घेता संबंधित खरेदीदाराकडून वसूल करण्यात यावा, असा पणन संचालकांचा आदेश असल्याचे सांगून कोले म्हणाले की, परंतु तत्कालीन शिवसेना-भाजप सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली होती. वास्तविक तत्कालीन पणनमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी देखील अडत खरेदीदाराकडून वसूल करण्यास संमती दिली होती. १९९५ मध्ये पणन संचालक बी. डी. पवार यांनी अडत खर्च, खरेदीदार, व्यापारी यांच्याकडून वसूल करण्याचे आदेश दिले होते. परंतु नंतर हा निर्णय बारगळला. अडत वसुली खरेदीदारांकडूनच करावी, अशी शेतकरी संघटनेची प्रारंभापासूनची मागणी आहे. यासाठी कित्येकवेळा आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र सध्या देखील काँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताब्यातील बहुतांश बाजार समित्यांनी शेतकऱ्यांची लूट सुरुच ठेवली आहे.
इतर सर्व मालाबाबत त्याची किंमत ठरविण्याचा अधिकार उत्पादकाला आहे. मग शेतकऱ्याला हा अधिकार मिळाला पाहिजे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियम १९६३ मध्ये देखील याचा कोठेच उल्लेख नाही. त्याचप्रमाणे अडत शेतकऱ्यांकडून वसूल करावी, असेही नमूद करण्यात आलेले नाही. हा निर्णय संबंधित बाजार समित्यांनी घ्यावयाचा आहे. यामुळे शासन आदेशाचा चुकीचा अर्थ काढून बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेऊ नये. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा. यासाठी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटूनही निवेदन देणार असल्याचेही कोले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Movement: If Sanjay Dutt gets relief, Sanjay Kolle