संतोष भिसेसांगली : सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहे. सप्टेंबर महिन्यात आरक्षणाची प्रक्रिया पार पडली होती. तेव्हापासूनच जिल्हाभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या घरातील लेकी, सुना व पत्नीसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत त्यांनी कुटुंबातील महिलेला निवडणुकीच्या रणांगणात उतरवले असून, आपली सर्व राजकीय यंत्रणा कामाला लावली आहे.तब्बल पावणेनऊ वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने अनेक कार्यकर्त्यांनी रिंगणात उतरण्याची तयारी केली होती. इतकी वर्षे साहेबांच्या राजकारणासाठी काम केले, आता जिल्हा परिषदेला संधी मिळेल अशी त्यांना आशा होती. पण, साहेबांनी आपल्याच कुटुंबातील महिलेला रिंगणात उतरविल्याने कार्यकर्त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. एकाच घरात अनेक वर्षे सत्तेची अनेक महत्त्वाची पदे आहेत. पतसंस्थेपासून दूध संघापर्यंत आणि ग्रामपंचायतीपासून नियोजन समितीपर्यंत अनेक ठिकाणी नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांची वर्णी लावली आहे. आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर त्यांचा डोळा आहे.१.भाजपचे दिग्गज नेते राहुल महाडिक यांनी येलूर मतदारसंघातून पत्नी हर्षदा यांना रिंगणात उतरविले आहे. राहुल हे सध्या जिल्हा बँकेचे संचालक आहेत. ते स्वत: २०१२-२०१७ या पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर त्यांच्या मातोश्री मीनाक्षीताई व बंधू सम्राट हेदेखील सदस्य होते. सम्राट हे सध्या सांगली भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत. याच कुटुंबातून आता हर्षदा या जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरल्या आहेत. याच गटातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (शरद पवार) देविका राजेघोरपडे यांनी अर्ज दाखल केला आहे.२.आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या सौभाग्यवती माधवी यादेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी निंबवडे गटातून उमेदवारी दाखल केला आहे. कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातून आता ब्रम्हानंद व गोपीचंद यांच्या पाठोपाठ माधवी यादेखील राजकीय क्षेत्रात उतरल्या आहेत.३.विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांची नात आणि शिराळ्याचे भाजपचे आमदार सत्यजित देशमुख यांच्या कन्या साईतेजस्वी यांनी शिराळ्याच्या कोकरुडमधून जनसुराज्य पक्षातून उमेदवारी जाहीर केली आहे. सत्यजित देशमुख यांनी स्वत: जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून यापूर्वी काम केले आहे. माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या सूनबाई राजेश्वरी यांनी वाकुर्डे बुद्रुकमधून अर्ज दाखल केला आहे.
४.विट्याचे उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्या पत्नी डॉ. शीतल यांनी खानापूर तालुक्यातील भाळवणी गटातून अर्ज दाखल केला आहे. जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांच्या पत्नी अस्मिता या बेडगमधून, मिरज पंचायतीच्या माजी सभापती जयश्री पाटील या एरंडोलीतून रिंगणात आहेत. जतच्या जाडरबोबलाद गटातून माजी सदस्य रवी तम्मनगौडा यांच्या कुटुंबातील सावित्री यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संखमधून जतचे माजी सभापती आर. के. पाटील यांच्या सूनबाई कविता यांनी अर्ज भरला आहे.
५.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडूनही अनेक ठिकाणी नेत्यांच्या कुटुंबातील महिलांनाच संधी दिली आहे. गेल्या टर्ममध्येही अध्यक्षपदी महिला होत्या, पण त्या थेटपणे कोणत्याही प्रस्थापित नेत्याशी संबंधित नव्हत्या. यावेळी मात्र आमदार किंवा राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांनीच कुटुंबातील महिलेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळविण्याचे प्रयत्न चालविल्याचे दिसते.अध्यक्षांना मंत्रीपदाचा दर्जाजिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो. हे पद जिल्ह्यात अत्यंत मानाचे असते. विधानसभेला संधी न मिळालेल्या नेत्यांचा डोळा अध्यक्षपदावर असतो. यंदाची त्यांनी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे नेत्यासाठी वर्षानुवर्षे काम केलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना यावेळीही सतरंज्याच उचलाव्या लागण्याची चिन्हे आहेत.