सांगली : द्राक्षबागायतदारांची फसवणूक टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीपूर्वी बाजार समितीचा परवाना घेण्याची गरज आहे. जे व्यापारी दुर्लक्ष करतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी मंगळवारी दिला. शेतकऱ्यांनी द्राक्षाची विक्री रोखीनेच करावी, असे आवाहनही त्यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीच्या प्रश्नावर बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी गायकवाड बोलत होते. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी भाऊसाहेब गलांडे, मिरजेचे प्रांताधिकारी सुभाष बोरकर, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, सांगली बाजार समितीचे सभापती संतोष पाटील, उपसभापती जीवन पाटील, सचिव प्रकाश पाटील, तासगाव बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, तासगावचे तहसीलदार सुधाकर भोसले उपस्थित होते.गायकवाड म्हणाले की, सध्या द्राक्षाचा हंगाम सुरु झाला असून, शेतकऱ्यांची परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी रोखीनेच विक्री करावी. व्यापाऱ्यांनी जिल्ह्यात द्राक्ष खरेदी करण्यापूर्वी संबंधित भागातील बाजार समितीकडून परवाना घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी परवानाधारक खरेदीदारांकडेच द्राक्षाची विक्री करावी. विक्रीनंतर संबंधित व्यापाऱ्यांकडून माल दिल्याची पोहोच तीन प्रतीत घ्यावी. यामध्ये वाहन क्रमांक, वाहन मालकांचे नाव, खरेदीदार, दलालाचे नाव आदींचा समावेश असावा. (प्रतिनिधी)करातून सूटद्राक्षबागायतदारांची लूट थांबविण्यासाठी सर्व व्यवहार बाजार समितीमध्ये करावेत. शेतकऱ्यांनी द्राक्षे आणल्यानंतर त्यास बाजार समिती कोणताही कर लावणार नाही. व्यापाऱ्यांनाही बाजार समितीमार्फत मूलभूत सुविधा देण्यात येतील. व्यापाऱ्यांनी बाजार समितीमधूनच खरेदीचे व्यवहार करावेत, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.
द्राक्ष खरेदी करताना बाजार समितीच्या परवान्याची सक्ती
By admin | Updated: December 23, 2015 01:29 IST