Sangli Politics: भाजप प्रवेशावरुन मदनभाऊ गटात फूट, जयश्रीताईसोबत जाण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:44 IST2025-06-20T13:42:27+5:302025-06-20T13:44:22+5:30
काही प्रमुख शिलेदार नाराज

Sangli Politics: भाजप प्रवेशावरुन मदनभाऊ गटात फूट, जयश्रीताईसोबत जाण्यास नकार
सांगली : जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री मदन पाटील यांनी काँग्रेसला रामराम करून बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये गेले आहेत. पण, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि दोन नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्यास नकार दिला आहे. यामुळे मदन पाटील गटात भाजप प्रवेशावरून फूट पडल्याचे दिसत आहे.
वसंतदादा पाटील यांच्या नातसून, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मदनभाऊ गटात फूट पडल्याचे दिसत आहे. काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मदनभाऊ गटापासून फारकत घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असता तर आम्ही त्यांच्यासोबत कायम राहिलो असतो, असे काही कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.
केवळ सांगलीच नव्हे, तर मिरज आणि कुपवाडमध्येही माजी मंत्री मदन पाटील यांनी कार्यकर्त्यांची चांगली मोट बांधली होती. मागासवर्गीय, मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजातील तरुणांची फळीही मदनभाऊ गटात कार्यरत होती. मदन पाटील यांच्या पश्चात हे सर्वजण जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहिले.
जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी इच्छा अनेक कार्यकर्त्यांची होती, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पर्याय निवडावा, अशी भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. अजित पवार हेही महायुतीत सत्तेत आहेत. राजकीय बळ मिळण्यासाठी तसेच वसंतदादा शेतकरी बँकेच्या वसुली प्रकरणातही अजित पवार यांची मदत होईल, अशा काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया होत्या.
मात्र मदनभाऊ गटातील प्रमुख नेते, कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर जयश्रीताई यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला, अशी चर्चा आहे. पण, मदनभाऊ गटाचे कट्टर समर्थक जिल्हा बँकचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. सिकंदर जमादार, माजी नगरसेवक फिरोज पठाण, तौफिक शिकलगार, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष कय्युम पटवेगार, युनूस महात या मदनभाऊ गटाच्या प्रमुख शिलेदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही.
कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार : सिकंदर जमादार
जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आमचा गट त्यांच्यासोबत गेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून काँग्रेसमध्ये थांबायचे की अन्य कोणत्या पक्षात जावे, याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रा. सिकंदर जमादार यांनी दिली.