Sangli: वाकुर्डे पाणी उपसा योजनेच्या गळतीने ५०० एकर क्षेत्राला धोका; आवर्तनावरून 'या' दोन तालुक्यात संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 18:35 IST2026-03-16T18:35:28+5:302026-03-16T18:35:52+5:30
पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा विरोध

Sangli: वाकुर्डे पाणी उपसा योजनेच्या गळतीने ५०० एकर क्षेत्राला धोका; आवर्तनावरून 'या' दोन तालुक्यात संघर्ष
शिराळा : वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या सिंचन आवर्तनावरून सध्या शिराळा व वाळवा तालुक्यात मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे दुष्काळी पट्ट्यातील गावे पाण्यासाठी मागणी करत असताना, दुसरीकडे कालवा गळतीमुळे नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. यामुळे जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून पेचात पडले आहेत.
वाकुर्डे बुद्रुक करमजाई तलाव ते मानकरवाडी या दरम्यान असलेल्या ३ किलोमीटरच्या कालव्याला मोठी गळती आहे. शासकीय सर्वेक्षणानुसार, या गळतीमुळे परिसरातील सुमारे ५०० एकर शेती नापीक होण्याची भीती आहे. सध्या शेतात ऊस, पावटा, मका यांसारखी पिके उभी आहेत. पाणी सोडल्यास ही पिके कुजून मोठे नुकसान होईल, असा पवित्रा स्थानिक शेतकऱ्यांनी घेतला आहे.
‘‘जोपर्यंत गळती प्रतिबंधक काम सुरू होत नाही, तोपर्यंत पाणी सोडू देणार नाही’’, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. शिराळा व वाळवा तालुक्यातील निगडी, पाडळी, आवंढी, खेड, रेड, बेलदारवाडी, कापरी, कार्वे, ढगेवाडी, ऐतवडे बुद्रुक, रेठरे धरण, ओझर्डे, सुरूल, मरळनाथपूर, धुमाळवाडी, वाघवाडी, शिवपुरी आदी गावांना पाण्याची तीव्र गरज असून त्यांनी आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे.
मात्र, वाकुर्डे येथील गळतीबाधित शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हे आवर्तन लांबणीवर पडले आहे. सध्या करमजाई तलाव पूर्ण भरला असून योजनेचे पंप सुरू आहेत. मात्र, मुख्य कालव्यातून पाणी सोडता येत नसल्याने तलावातील पाणी सांडव्यावरून शिराळा येथील मोरणा प्रकल्पात वळवण्यात येत आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी तीन दिवसांपासून शेतकऱ्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तो अद्याप यशस्वी झालेला नाही.
करमजाई तलाव ते मानकरवाडी दरम्यानच्या ३ किमी कालव्याच्या गळतीमुळे ५०० एकर जमिनीवर संकट ओढवले आहे. पाणी सोडल्यास ऊस, पावटा आणि मका ही पिके तर वाया जातीलच, पण आगामी पावसाळ्यामुळे ही जमीन वर्षभर पडून राहण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर मोठा घाला पडणार आहे. - निवृत्ती शेटके, शेतकरी, वाकुर्डे बुद्रुक
या योजनेचे पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र कालव्याच्या गळतीमुळे करमजाई तलाव ते मानकरवाडी येथील पिकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे पाणी सोडण्यास विरोध होत आहे. जलसंपदा विभागाचे कर्मचारी व अधिकारी गेले तीन दिवस शेतकऱ्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक शेतकरी गळती प्रतिबंधक काम सुरू झाल्याशिवाय पाणी सोडू देणार नाही, या मागणीवर ठाम आहेत. - एन. टी. पोतदार, कार्यकारी अभियंता.