कर्नाटक सरकारकडून 'अलमट्टी'ची उंची वाढवण्याचे संकेत, महाराष्ट्र सरकार केंद्राकडे दाद कधी मागणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 17:12 IST2026-03-18T17:11:25+5:302026-03-18T17:12:15+5:30
कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल

कर्नाटक सरकारकडून 'अलमट्टी'ची उंची वाढवण्याचे संकेत, महाराष्ट्र सरकार केंद्राकडे दाद कधी मागणार ?
सांगली : कर्नाटक सरकारकडूनधरणाची उंची वाढवण्याचे संकेत दिले असून, त्यासाठी बुडित क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. परंतु, महाराष्ट्र राज्य सरकार अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात काहीही करायला तयार नाही. याबद्दल कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या पदाधिकारी निवडीसाठी सांगलीत मंगळवारी बैठक झाली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या बैठकीस निमंत्रक सर्जेराव पाटील, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, प्रदीप माने, विकास जाधव आदी उपस्थित होते.
सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार व सर्जेराव पाटील म्हणाले, कोल्हापूर, मुंबई, पुणे आणि दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठका घेऊन प्रश्न मांडण्यात आला. याशिवाय संबंधित अधिकारी व अभियंत्यांसोबतही अनेक वेळा चर्चा झाली. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे.
कर्नाटक सरकारकडून धरणाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. धरणाच्या बुडित क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांवर पुराचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे तरीही महाराष्ट्र सरकार काही प्रयत्न करत नसल्यामुळे त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “सांगली, कोल्हापूर भागावर वारंवार अन्याय होत आहे. पुरामुळे शेतकरी, व्यापारी, जनावरे आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. या समस्येचा सखोल अभ्यास होणे अत्यंत गरजेचे आहे,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
कृष्णा महापूर नियंत्रण समिती अध्यक्षपदी अभिषेक दिवाण
कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या बैठकीमध्ये समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अभिषेक विजयकुमार दिवाण यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये सदस्य म्हणून राकेश माळी, श्रीशैल्य मठपती, सचिन सागरे, महावीर नाईक, चंद्रकांत पाटील, दुर्गादेवी सरगर, रमेश कुंभार, मोहन चोरमुले, डॉ. एम. ए. पाटील यांची निवड करण्यात आली.