Sangli News: रस्ता अडवल्याच्या वादातून कवलापूर येथे दोन कुटुंबात हाणामारी; लोखंडी रॉड, चाकूने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 14:27 IST2026-03-10T14:27:19+5:302026-03-10T14:27:38+5:30
सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल

Sangli News: रस्ता अडवल्याच्या वादातून कवलापूर येथे दोन कुटुंबात हाणामारी; लोखंडी रॉड, चाकूने वार
सांगली : कवलापूर ते बिसूर रस्त्यावर ट्रॅक्टर रस्त्यात आडवा लावल्याचा जाब विचारल्याच्या कारणातून दोन कुटुंबात जोरदार वादावादी होऊन लोखंडी रॉडने व चाकूने वार केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे.
फिर्यादी अभिषेक बाळू माळी (वय २५, रा. हायस्कूल नजीक, कवलापूर) यांनी संशयित सागर पाटील आणि प्रशांत पाटील (दोघेही रा. कवलापूर) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. अभिषेक माळी हे रविवारी दुपारी ३:३० च्या सुमारास मोटार (एमएच १० ईए ८१४५) मधून सासू रूपाली माळी, चुलत सासू कविता माळी आणि छाया माळी यांना सोडण्यासाठी जात होते. बिसूर ते कवलापूर रस्त्यावरील पोतदार यांच्या गोदामासमोर रस्त्यावर संशयित सागर पाटील हा मळणी मशीन जोडलेला ट्रॅक्टर घेऊन आला. रस्ता लहान असल्याने दोन्ही वाहने जाऊ शकत नव्हती.
अभिषेक माळी यांनी त्यांची मोटार मागे घेण्यास सुरुवात केली. संशयित सागर पाटील याला जायची गडबड असल्याने त्याने अभिषेक यांना दमदाटी आणि शिवीगाळ केली. याचा जाब विचारताच सागरने रस्त्यातच आडवा ट्रॅक्टर लावला. रस्त्यावरून कसा जातोस ते बघतो असा दम अभिषेक यांना दिला. यावरून वादावादी झाल्यानंतर दोघा संशयितांनी लोखंडी रॉडने मारून अभिषेक यांना तसेच भाऊ किसन माळी, यश माळी यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान प्रशांत सुरेश पाटील यांनी संशयित यश माळी, अभिषेक माळी, किसन माळी यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. सागर पाटील यांना तिघे संशयित मारहाण करत होते. वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर संशयित यश माळी याने चाकू काढून डाव्या खांद्यावर वार केला. तो खांद्यात अडकला. तसेच अभिषेक व किसन यांनी दोघांना शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.