पीकविम्याची रक्कम परस्पर हडपली, सांगली जिल्हा बँकेच्या बाज शाखेत ३१ लाखांचा अपहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 18:31 IST2026-03-06T18:30:53+5:302026-03-06T18:31:21+5:30
सहा वर्षांनी गुन्हा दाखल

संग्रहित छाया
जत : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाज शाखेतील पीकविमा खात्यातील ३१ लाख ८६ हजार ५०० रुपयांची रक्कम संगनमताने परस्पर काढून अपहार केल्याप्रकरणी बँकेच्या चार कर्मचाऱ्यांवर जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप महादेव सोलनकर (रा. जत), जयाजी पांडुरंग शिंदे (रा. डफळापूर), कोंडीबा महादेव खरात (रा. बाज), मौला मीरा शेख (रा. छत्रीबाग रोड, जत), अशी गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याबाबत मुख्य शाखेतील पडताळणी अधिकारी प्रवीण अनू कोळी यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबतची माहिती अशी, बाज शाखेत २०१४ सालातील खरीप हंगामाचा राष्ट्रीय पीकविमा जमा झाला होता. ही रक्कम २०१४ ते २०१८ या कालावधीत गुन्हा दाखल केलेल्या चार कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बँकेच्या विमा खात्यातील ३१ लाख ८६ हजार ५०० रुपये परस्पर हडप केले. त्यामुळे बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहा वर्षांनी गुन्हा दाखल
गोरगरीब शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पीकविमा उतरविला होता. नुकसान होऊन आणि पीकविम्याची रक्कम जमा होऊन ११ वर्षे झाले. तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास बँकेतील कर्मचाऱ्यांनीच हिरावून घेतला. दरवर्षी बँकेचे ऑडिट होत असते. तरीही गुन्हा दाखल करायला तब्बल ६ वर्षांचा कालावधी का लागला? असा प्रश्न विचारला जात आहे.