राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल

By संतोष कनमुसे | Updated: July 24, 2025 08:43 IST2025-07-24T08:27:12+5:302025-07-24T08:43:31+5:30

सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी येथे एका सरकारी कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

bill was not received on time from the state governmentthe contractor end life the Jayant Patil made the allegations | राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल

राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल

मागील काही दिवसांपासून राज्यातील सरकारी कंत्राटदारांकडून बिल वेळेत मिळत नसल्याचा आरोप होत आहे. याबाबत सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी या गावातील सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली. राज्य सरकारकडून वेळेत बिलं मिळत नसल्याने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप सरकारी कंत्राटदारांच्या संघटनेकडून करण्यात आला आहे. दरम्यान, आता आमदार जयंत पाटील यांनीही राज्य सरकारवर आरोप केले आहेत. 

शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन

आमदार जयंत पाटील यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करुन सरकारवर टीका केली. "आज वाळवा तालुक्यातील तरुण, होतकरू हर्षल पाटील या अभियंता कंत्राटदाराने जलजीवन मिशनच्या केलेल्या कामाचे शासनाकडून पैसे मिळत नसल्याने, सरकारच्या त्रासाला व भ्रष्टाचाराला कंटाळून आत्महत्या केली. ही अत्यंत दुःखद घटना आहे. हर्षलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

सरकारच्या रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं कंत्राटदारीकडे वळली. स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आपलं विश्व निर्माण करु पाहणाऱ्या युवकांच्या स्वप्नावर सरकारने पाणी फेरले. राज्य शासनाने निवडणुका जिंकण्यासाठी तिजोरीत पैसे नसतांना विविध कंत्राटांचे वाटप केले. आज थकलेली बिले घेण्यासाठी राज्यातील कंत्राटदार सरकारच्या दारात याचना व आंदोलने करत आहेत. ही एका खात्याची परिस्थिती नसून, सर्वच खात्यांची परिस्थिती आहे.

एका कंत्राटदारावर केवळ एक घर चालत नसून त्याच्यावर अनेक कामगारांची कुटुंबे सुद्धा अवलंबून असतात, याचे सरकारला कसलेही भान राहिलेले नाही.

'शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रमाणे कंत्राटदारांच्या आत्महत्यांची मालिका सुरु होईल अशी मला भीती वाटते. या परिस्थितीवर सरकारने तात्काळ तोडगा काढावा", अशी मागणी जयंत पाटील यांनी पोस्टमध्ये केली आहे. 

कर्जाच्या पैशांसाठी लोकांचा तगादा

हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशनची कामे घेतली होती. या कामासाठी त्यांनी लोकांकडून कर्ज घेतले होते. काम पूर्ण करुनही सरकारकडून बिल निघाली नव्हती. यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा आकडा वाढतच होता. लोकांनीही तगादा दिला होता. काल यामुळे त्यांनी स्वत:च्या शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या करून आपले जीवन संपवंले आहे. 

शासनाकडे जवळपास १.४० कोटींचे देयके प्रलंबित आहेत. सावकार व इतर आर्थिक लोकांकडून त्याने‌ जवळपास ६५ लाखांचे कर्ज घेतले होत. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून तो त्यांच्या मित्रांना मी आत्महत्या करतो हे शासन पैसे देत नाही इतर लोक मला पैशासाठी तगादा लावत आहेत वडिलांना काय सांगू‌ नका असे बोलत होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Web Title: bill was not received on time from the state governmentthe contractor end life the Jayant Patil made the allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.