Sangli News: काळम्मादेवीची यात्रा, मंदिर परिसरात येतो वाघ; उदगिरीतील परंपरा चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 19:04 IST2026-03-06T18:47:58+5:302026-03-06T19:04:51+5:30
कॅमेरा ट्रॅपमध्ये बाजीची नोंद

Sangli News: काळम्मादेवीची यात्रा, मंदिर परिसरात येतो वाघ; उदगिरीतील परंपरा चर्चेत
आनंदा सुतार
वारणावती : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील उदगिरी येथे वसलेल्या काळम्मादेवीच्या पवित्र धामात धूलिवंदनाच्या यात्रेला दरवर्षी हजारो भाविक मोठ्या भक्तिभावाने उपस्थित राहतात. या यात्रेशी जोडलेली एक विलक्षण श्रद्धा स्थानिकांमध्ये पिढ्यानपिढ्या सांगितली जाते. देवीच्या यात्रेच्या काळात सह्याद्रीतील वाघ तिच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात येतो. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत वन विभागाच्या नोंदींमुळे या श्रद्धेला वेगळाच आधार मिळाल्याचे दिसून येत आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या निरीक्षणानुसार, गेल्या तीन वर्षांपासून यात्रेच्या काळात मंदिराभोवतीच्या जंगलात वाघाच्या हालचालींची नोंद होत आहे. यंदा ‘एसटीआर टी-०३’ म्हणून ओळखला जाणारा ‘बाजी’ हा वाघ मंदिर परिसरातील जंगलात वावरताना कॅमेरा ट्रॅपमध्ये स्पष्टपणे टिपला गेला. त्यामुळे श्रद्धा आणि विज्ञान यांचा अनोखा संगम उदगिरीच्या पवित्र भूमीत अनुभवायला मिळत असल्याचे चित्र आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत येणाऱ्या आंबा वनपरिक्षेत्रातील उदगिरी हे गाव सह्याद्रीच्या समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाते. येथे असलेले प्राचीन काळम्मादेवी मंदिर गावाची खास ओळख ठरते. धूलिवंदनाच्या दिवशी भरत असलेली यात्रा हा परिसरातील मोठा आध्यात्मिक उत्सव मानला जातो. या दिवशी हजारो भाविक देवीच्या चरणी माथा टेकण्यासाठी येथे येतात.
भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी विशेष खबरदारी घेतात. वनक्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, वनवे लागू नयेत तसेच अवैध शिकार किंवा वृक्षतोड होऊ नये यासाठी विविध ठिकाणी गस्त पथके तैनात केली जातात. कॅमेरा ट्रॅप, नियमित गस्त आणि स्थानिकांच्या सहकार्यामुळे जंगलातील वन्यजीव व मानव यांच्यातील समतोल राखण्याचे काम केले जाते.
यंदा ‘बाजी’ने अवघ्या सात दिवसांत सुमारे १५० किलोमीटरचा प्रवास करत होळीच्या दिवशी उदगिरी परिसर गाठल्याची नोंद आहे. योगायोग असा की, त्याच दिवशी काळम्मादेवीची भव्य यात्रा भरली होती. त्यामुळे सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत दरवर्षी श्रद्धा, परंपरा आणि वन्यजीव संरक्षणाचा अद्भुत संगम पाहायला मिळत आहे.
काळम्मादेवीची यात्रा ही श्रद्धा, परंपरा आणि वन्यजीव संरक्षण यांचा सुंदर संगम दाखवणारे उदाहरण आहे. स्थानिक ग्रामस्थ, वन कर्मचारी आणि भाविक यांच्या सहकार्यामुळे येथे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संतुलन टिकून आहे. - तुषार चव्हाण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक.