महायुतीच्या समन्वय समितीत जे ठरतं तेच घडतं; स्थानिक पातळीवरील टीकांवरून मंत्री सामंतांनी काढला चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:31 IST2025-06-23T14:31:18+5:302025-06-23T14:31:54+5:30
‘त्या’ निर्णयांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मान्यता

महायुतीच्या समन्वय समितीत जे ठरतं तेच घडतं; स्थानिक पातळीवरील टीकांवरून मंत्री सामंतांनी काढला चिमटा
रत्नागिरी : महायुतीच्या समन्वय समितीत जे ठरतं तेच घडतं, स्थानिक पातळीवर युती करायची की नाही, हे ठरत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर काेण काय बाेलले, याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. प्रत्येकाचा मानसन्मान राखून युती झाल्यास मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकेल, असे राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रत्नागिरीत घेतलेल्या आढावा बैठकीची माहिती देण्यासाठी रविवारी मंत्री उदय सामंत यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात महायुती म्हणून लढण्याची इच्छा शिंदेसेनेचीही आहे. याबाबत भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशीही माझी चर्चा झाली असून, त्यांनीही या गाेष्टीला सहमती दिलेली आहे. प्रत्येकाचा मानसन्मान राखू. महायुती झाली तर महायुतीचा भगवा निश्चितच फडकेल, असे त्यांनी सांगितले.
भाजपचे माजी आमदार डाॅ. विनय नातू यांनी केलेल्या आराेपाबाबत विचारले असता ते म्हणाले, त्याला जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख, तालुकाप्रमुख हे उत्तर देतील, असे सांगितले. मी समन्वय समितीत आहे. तीन पक्षांचे जे संघटनात्मक धाेरण ठरतं त्या समन्वय समितीत मी प्रमुख आहे. त्यामुळे खालच्या पातळीवर काेण काय बाेलले, याकडे लक्ष देणे आवश्यक वाटत नाही. आम्ही धाेरण करताे, जिल्ह्याला पाठवताे त्याची अंमलबजावणी तिथल्या जिल्हाध्यक्षांनी करायची आहे, असे त्यांनी सांगितले.
‘त्या’ निर्णयांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मान्यता
महायुतीच्या समन्वय समितीत मी असेन, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ यांनी जे निर्णय घेतले त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे काेण काय बाेलतं, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे मंत्री सामंत म्हणाले.