चिपळूणच्या वाशिष्ठी, शिवनदीच्या पाणी पातळीत वाढ; प्रशासकीय यंत्रणा सतर्क, एनडीआरएफने केली पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:36 IST2025-06-17T18:34:52+5:302025-06-17T18:36:19+5:30
कोळकेवाडी धरणातील विद्युत निर्मिती बंद

चिपळूणच्या वाशिष्ठी, शिवनदीच्या पाणी पातळीत वाढ; प्रशासकीय यंत्रणा सतर्क, एनडीआरएफने केली पाहणी
चिपळूण : गेल्या दोन दिवसांपासून काेसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी व शिवनदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर वाढल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून, एनडीआरएफ जवानांसोबत धोकादायक ठिकाणी सोमवारी पाहणी करण्यात आली.
मान्सूनपूर्व पावसामुळे चिपळूण परिसरातील अडरे, कामथे, खोपड धरणे आधीच भरली आहेत. चिपळुणात रविवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत काेसळणाऱ्या पावसामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या वाशिष्ठी व शिवनदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. नाईक कंपनी पुलाच्या एका बाजूला दुथडी भरून वाहणाऱ्या वाशिष्ठीचे पाणी पात्राबाहेर आले होते. याशिवाय शिवनदीतील पाणी पातळीही वाढल्याने ती ओसंडून वाहत होती. मात्र, वाशिष्ठी नदीने सायंकाळपर्यंत इशारा पातळी व धोकादायक पातळी ओलांडली नव्हती.
साेमवारी दुपारी वाशिष्ठी पाणी पातळी ४ मीटरवर पोहोचल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एनडीआरएफच्या पथकासोबत वाशिष्ठी व शिवनदीच्या पाणी पातळीची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे टेरव येथील जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरण्याचा प्रकार घडला. मात्र, येथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
दरम्यान, या पावसामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. सोमवारी बाजारपेठ बंद असल्याने त्याचा फारसा परिणाम जाणवला नसला तरी सुरक्षितस्थळी माल हलवण्यासाठी काहींनी दुकाने उघडी ठेवली होती.
विद्युत निर्मिती बंद
कोळकेवाडी धरणाची पातळी १३३.७५ मीटरवर पोहोचल्याने ती नियंत्रणात आणण्यासाठी दोन मशीनद्वारे विद्युत निर्मिती सुरू होती. मात्र, वाढता पाऊस आणि भरतीची वेळ लक्षात घेत दुपारी २ ते ५ दरम्यान विद्युत निर्मिती बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.