Ratnagiri: शेतातील काम आटोपून आई-वडील घरी आले, अन् पाहिले तर..
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:26 IST2025-06-13T16:26:21+5:302025-06-13T16:26:21+5:30
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला

Ratnagiri: शेतातील काम आटोपून आई-वडील घरी आले, अन् पाहिले तर..
राजापूर : शेतीच्या कामासाठी आईवडील घराबाहेर गेले होते. तेथून ते परत आले, त्यावेळी त्यांना घरामध्ये मुलीचा मृतदेह दिसला. विजेचा शॉक लागून तिचा मृत्यू झाला होता. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील धाऊलवल्ली येथे बुधवारी (११ जून रोजी) दुपारी घडली आहे. स्वरांगी संदीप गिजम (१३, गिजमवाडी, धाऊलवल्ली राजापूर) असे या मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप गिजम यांचे कुटुंबीय शेतीच्या कामासाठी घराबाहेर गेले होते. त्यांची मुलगी स्वरांगी ही एकटीच घरी होती. यावेळी घरातील पंख्याच्या उघड्या वायरला तिचा स्पर्श झाला आणि तिला विजेचा तीव्र धक्का बसला. तिचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी घरामध्ये कोणीच नसल्याने तिला कसलीही मदत मिळाली नाही.
शेतातील काम आटोपून गिजम घरी परतल्यावर मुलगी निपचित पडली असल्याचे त्यांना दिसले. त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने स्वरांगीला रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती. याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.