आंबा नुकसानाच्या वस्तुस्थितीचा विस्तृत अहवाल पाठवा : उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 14:00 IST2026-03-09T13:59:53+5:302026-03-09T14:00:25+5:30
बागायतदारांसाठी जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मंत्रालयात बैठक घेऊन प्रयत्न करणार

आंबा नुकसानाच्या वस्तुस्थितीचा विस्तृत अहवाल पाठवा : उदय सामंत
रत्नागिरी : गतवर्षीपेक्षा यावर्षी ८० टक्के कमी आंबा उत्पादन होत असल्याने याबाबतीतील कारणांसह तालुकानिहाय वस्तुस्थितीचा विस्तृत अहवाल शासनाकडे पाठवावा. आंबा बागायतदारांसाठी जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मंत्रालयात बैठक घेऊन प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
रत्नागिरी जिल्हा आंबा बागायतदार यांच्या अडीअडचणी संदर्भात मंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, स्वीकृत नगरसेवक प्रदीप उर्फ बंड्या साळवी तसेच आंबा बागायतदार उपस्थित होते.
कृषी विभाग आणि कोकण कृषी विद्यापीठाने दिलेल्या संयुक्त अहवालात प्रदीर्घ दव व थंडीमुळे मोहर काळा पडला, नर माेहरांचे प्रमाण वाढले, तुडतुडा, फुलकिडीमुळे गतवर्षी पेक्षा चालूवर्षी ८० टक्के आंबा उत्पादन कमी झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, पणनमंत्री जयकुमार रावल तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समवेत लवकरच बैठक आयोजित करून त्यामध्ये जिल्ह्यातील आंबा काजू बागायतदारांचे प्रश्न मार्गी लावण्यासह त्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र बसविले जाणार असून, असे केंद्र बसवणारा राज्यातील रत्नागिरी पहिला जिल्हा असेल, अशी ग्वाही पालकमंत्री सामंत यांनी दिली.
विद्यापीठाने संशोधन करावे
आंब्यावर प्रादुर्भाव होणार नाही, त्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करावे. काजू, कोकम, फणस यावर संशोधन झाले पाहिजे. त्याचबरोबर फवारणी आधी एक महिना विद्यापीठाने वेळापत्रक दिले पाहिजे.
‘रत्नागिरी हापूस’चे महत्त्व कमी होऊ देणार नाही
रत्नागिरी हापूसचे महत्त्व अजिबात कमी होऊ देणार नाही. त्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली जाईल. त्यांच्याशी चर्चा करुन ‘रत्नागिरी हापूस’बाबत समस्या सोडवू. जे मांडायचे आहे तेही मांडू. ‘रत्नागिरी हापूस’ आपली चव आहे, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
‘सीएमईजीपी’ उद्दिष्ट पूर्ण करावा
बँका या शेतकऱ्यांसाठी आहेत. सिबील स्कोर न पाहता त्यांनी कर्ज दिलेच पाहिजे. शेतकऱ्यांची मुले व्यावसायिक, उद्योजक करण्यासाठी बँकांनी ‘सीएमईजीपी’चे दिलेली उद्दिष्ट पूर्ण करावीत. ज्या बँका विनाकारण शेतकऱ्यांना सिबील स्कोअरवरून त्रास देत असतील, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा. ज्या बँका ‘सीएमईजीपी’ची उद्दिष्टे पूर्ण करणार नाहीत, त्या बँकांमधील शासकीय खाती काढून घेतली जातील, असा इशाराही पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.