पावसाचा दिवसा जोर, रात्री घोर; रत्नागिरीत आठ दिवसांत सर्वाधिक ५६६ मिमी. पावसाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 18:38 IST2025-05-28T18:37:56+5:302025-05-28T18:38:46+5:30
संगमेश्वर तालुक्यात सलग १३ दिवस संततधार पाऊस

पावसाचा दिवसा जोर, रात्री घोर; रत्नागिरीत आठ दिवसांत सर्वाधिक ५६६ मिमी. पावसाची नोंद
रत्नागिरी : मे महिन्यात एवढे दिवस सलग पाऊस पडण्याचा आतापर्यंतचा हा उच्चांक जिल्ह्यात पहिलाच आहे. २० किंवा २१ मे पासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला असला तरी काही तालुक्यांमध्ये आतापर्यंत १२ ते १३ दिवस पाऊस पडत आहेत. गेल्या २७ दिवसांत जिल्ह्यात तब्बल ४६८ मिलीमीटर सरासरी पाऊस पडला आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या १३ टक्के पाऊस आताच पडला आहे. आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. दिवसा मुसळधार पडणाऱ्या पावसाचा रात्री वाऱ्यासह जोर अधिक वाढलेला असतो.
जिल्ह्यात आतापर्यंत मे महिन्यात सलग पाऊस पहिल्यांदाच पडत आहे. जिल्ह्यात साधारणपणे ३३६४.२२ मिलीमीटर इतका पाऊस वार्षिक सरासरीने पडतो. मात्र, या मे महिन्यात जिल्ह्यात २७ मे पर्यंत (दुपारी २ वाजेपर्यंत) एकूण ४६२ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद जिल्ह्यातील ६५ मंडलामध्ये करण्यात आली आहे. म्हणजेच वार्षिक सरासरीच्या १३ टक्के पाऊस या २७ दिवसांच्या आत पडला आहे. अजूनही मान्सूनला प्रारंभ होण्यास काही दिवस आहेत. मात्र जून-जुलै महिन्यासारखा पाऊस गेल्या पाच-सहा दिवसांपासून पडत आहे.
सोमवारी दिवसा अधूनमधून थोडीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री जोर घेतला होता. मंगळवारी सकाळपासून सर्वच तालुक्यांमध्ये काही काळ उघडीप होती. मात्र, राजापूर, दापोली, गुहागर, रत्नागिरी आदी तालुक्यांमध्ये पावसाचा जोर होता. मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६३.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. सध्या दिवसा पावसाची मुसळधार सुरू असली तरी अधूनमधून विश्रांती ही असते. रात्री मात्र,पाऊस संततधारेने पडत असतो. जिल्ह्यात ३१ मे पर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
कमी दिवसात अधिक पाऊस रत्नागिरीत
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २७ दिवसांत संगमेश्वर तालुक्यात १३ दिवसांत ५०२.७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. मात्र, रत्नागिरी तालुक्यात आठ दिवसांतच सर्वाधिक ५६६.६ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
कुठल्या तालुक्यात किती दिवस?
१ ते २७ मे या कालावधीत संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक १३ दिवस पाऊस पडला आहे. तर गुहागर, लांजा, राजापूर या तालुक्यांमध्ये १२ दिवस, चिपळूणमध्ये १९, खेडमध्ये ९, रत्नागिरी आणि दापोलीत ८, तर मंडणगड तालुक्यामध्ये ७ दिवस पाऊस पडला आहे.