पत्नीशी झालेल्या वादानंतर पतीने घेतला गळफास, रत्नागिरीतील नातुंडे मावळंगे येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 13:44 IST2026-02-19T13:44:01+5:302026-02-19T13:44:11+5:30
वडिलांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी हा प्रकार घडल्याने कुटुंबाला बसला धक्का

पत्नीशी झालेल्या वादानंतर पतीने घेतला गळफास, रत्नागिरीतील नातुंडे मावळंगे येथील घटना
पावस : पत्नीशी झालेल्या वादानंतर पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी रत्नागिरी तालुक्यातील पावस नजीकच्या नातुंडे मावळंगे येथे घडला. दत्ता मारुती पाटील असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशीच हा दुर्दैवी प्रकार घडल्याने पाटील कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
दत्ता पाटील यांच्या वडिलांचे तीन दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यासाठी सारी भरणी करता सर्वजण मुंबईहून गावी आले होते. मात्र बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दत्ता पाटील दारू पिऊन घरी आले. त्यामुळे त्यांचा पत्नीशी वाद झाला. वाद घालता घालता त्यांनी पत्नीला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यामुळे त्यांची आई शारदा पाटील मध्ये पडल्या. वाद वाढू नये, म्हणून त्यांनी आपल्या मुलाला दत्ता यांना घराबाहेर अंगणात पाठवले.
या प्रकारानंतर दत्ता पाटील यांनी अचानक घराचा दरवाजा बाहेरून कडी लावून बंद केला आणि अंगणाच्या लोखंडी बारला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. मारुती पाटील यांच्या मृत्यूचा शाेक थांबण्याआधीच दत्ता यांचेही प्राण गेल्यामुळे पाटील कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी पूर्णगड सागरी पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.