रत्नागिरीत रात्री मुसळधार; दिवसा उन्हाचा कडाका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:56 IST2025-06-10T15:54:25+5:302025-06-10T15:56:02+5:30
सध्या शेतकऱ्यांसह नागरिक मान्सून नियमित होण्याची प्रतीक्षा करत आहेत

रत्नागिरीत रात्री मुसळधार; दिवसा उन्हाचा कडाका
रत्नागिरी : पावसाने गेल्या काही दिवसांपासून रात्री मुसळधारेने पडण्यास सुरूवात केली आहे. मात्र, दिवसा कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागत आहे. रविवारी रात्री विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली हाेती. साेमवारी सकाळीही पावसाचा जाेर कायम हाेता. मात्र, त्यानंतर कडक ऊन पडले हाेते.
पावसाने मे महिन्यात जोरदार वृष्टी केली असली, तरी मे महिन्याच्या शेवटच्या तीन-चार दिवसांपासून विश्रांती घेण्यास सुरूवात केली आहे. हवामान खात्याकडून अधूनमधून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात पावसाचा जोर कमी झाला आहे.
रविवारी दिवसभर पावसाचे वातावरण होते. त्यामुळे किरकोळ सरी पडतील, असे वाटत होते. मात्र, पावसाने हुलकावणीच दिली होती. रात्री १० वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह विजांच्या लखलखाटात पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जाेर पाहता मान्सूनचे आगमन झाल्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली गेली. मात्र, हा पाऊस जिल्ह्यातील काही भागातच पडला तर काही भाग काेरडेच राहिले.
सोमवारी सकाळी आभाळ ढगाळलेले असल्याने जोरदार पावसाची शक्यता वाटत होती. मात्र, सकाळी एकच सर कोसळल्यानंतर पावसाने पुन्हा दिवसभर विश्रांती घेतली हाेती. त्यामुळे उकाडा वाढला. अधूनमधून ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाची दिवसभर पाठच होती. परंतु, वातावरणातील बदल पाहता रात्री जोरदार वृष्टी होण्याची शक्यता वाटत होती.
दरम्यान, हवामान खात्याने १० ते १२ जूनपासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र, सध्या दिवसभर वातावरण कोरडे राहात असून, रात्री पावसाचा जोर वाढलेला असतो. परंतु, दिवसा उन्हामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांसह नागरिक मान्सून नियमित होण्याची प्रतीक्षा करत आहेत.