Ratnagiri: जयगड येथे समुद्रात थांबलेल्या जहाजावरील विदेशी इंजिनिअरचा आकस्मिक मृत्यू, इजिप्तहून आले होते कोळसा घेऊन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:24 IST2025-06-23T13:23:10+5:302025-06-23T13:24:25+5:30
क्रू मेंबरनी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन पाहिले असता, ते बेशुद्ध पडल्याचे दिसले.

संग्रहित छाया
रत्नागिरी : इजिप्तहून कोळसा घेऊन जयगड येथील समुद्रात थांबलेल्या जहाजावरील विदेशी इंजिनिअरचा आकस्मिक मृत्यू झाला. याबाबत जयगड पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. एलमीर अल्कारेज मोलीना (वय ५१, रा. आरगाव सेबु, फिलिपिन्स) असे इंजिनिअरचे नाव आहे.
ते एम. व्ही. डाली या जहाजावर सेकंड इंजिनिअर म्हणून कामाला होते. हे जहाज इजिप्तहून कोळसा घेऊन जे.एस.डब्ल्यू पोर्टपासून सुमारे नॉटिकल मैल समुद्रात नांगर टाकून उभे होते. त्यावेळी एलमीर मोलिना हे केबीनमध्ये जेवण करून गेले हाेते. ते परत बाहेर न आल्याने इतर क्रू मेंबरनी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन पाहिले असता, ते बेशुद्ध पडल्याचे दिसले.
त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून जे.एस.डब्ल्यू पोर्टचे भीम टगमधून जे.एस.डब्ल्यू पोर्ट जेटी क्र. ए ४ येथे आणण्यात आले. तिथे खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले.