रत्नागिरीत उपअभियंत्याची बनावट सही करून खोटी तक्रार, अज्ञातावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:58 IST2026-01-30T15:57:53+5:302026-01-30T15:58:23+5:30
नावाचा आणि सहीचा गैरवापर करून त्यांच्याच नावाने वरिष्ठांकडे खाेटा माफीनामा व तक्रार केली

रत्नागिरीत उपअभियंत्याची बनावट सही करून खोटी तक्रार, अज्ञातावर गुन्हा दाखल
रत्नागिरी : येथील मिरजोळे एमआयडीसी कार्यालयातील उपअभियंता स्थापत्य पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याच्या नावाचा आणि सहीचा गैरवापर करून त्यांच्याच नावाने वरिष्ठांकडे खाेटा माफीनामा व तक्रार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. हा प्रकार २३ डिसेंबर २०२५ राेजी घडला असून, याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी उपअभियंता भास्करराव निवृत्ती पाटील (वय ५४, रा. एमआयडीसी कॉलनी, उद्यमनगर, रत्नागिरी) यांनी बुधवारी (२८ जानेवारी) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताने त्यांच्या नावाचा व सहीचा गैरवापर करून एक अर्ज तयार केला. हा अर्ज मुंबईतील एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात सादर केला. त्यामध्ये पाटील यांनी पदोन्नती मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्र तयार केली.
तसेच फिर्यादीविरोधात वेळोवेळी झालेल्या तक्रारी फिर्यादीने आपल्या राजकीय संपर्काचा गैरवापर करून त्या तक्रारींवर कार्यवाही होऊ नये, यासाठी अडथळे निर्माण केले. तसेच फिर्यादीने शासकीय नियमांचे उल्लंघन करून रत्नागिरी व विमाननगर (पुणे) येथे महामंडळाचे दोन प्लॉट मिळवले. दुसरी जागा घेताना फिर्यादीने आपल्याकडे कोणतीही जागा नसल्याची खोटी स्वयंघोषणा करून जागा मिळवली.
त्याचप्रमाणे फिर्यादीने राजकीय ओळखीचा वापर करून वरिष्ठ अधिकारी तसेच अधिनस्त कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला. फिर्यादीच्या या वर्तनामुळे संस्थेला, सहकाऱ्यांना तसेच जनसामान्यांच्या विश्वासाला धक्का पोहाेचला आहे. त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असे त्या अर्जात म्हटले आहे. हा अर्ज अज्ञाताने भास्करराव पाटील यांच्या लौकिकास बाधा यावी, या उद्देशाने दिल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.